नाबार्डचा १५ हजार २१६ कोटी रुपयांचा पतआराखडा-जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते विमोचन
छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी-जिल्ह्याचा सन २०२५-२६ साठी १५ हजार २१६ कोटी रुपयांचा पतआराखडा नाबार्ड मार्फत तयार करण्यात आला असून जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी या आराखड्याचे विमोचन केले. जिल्हा अग्रणी बॅंकेचे व्यवस्थापक मंगेश केदार आणि नाबार्डचे जिल्हा व्यवस्थापक सुरेश पटवेकर हे यावेळी उपस्थित होते.
या संदर्भत नाबार्डचे व्यवस्थापक सुरेश पटवेकर यांनी माहिती दिली की, कृषी पत, कृषी पायाभूत सुविधा आणि पूरक क्षेत्रविकास अशा तीन क्षेत्रांचे वर्गीकरण करुन पतआराखड्यात तरतूद करण्यात आली आहे. त्यात कृषी पत यात ४ हजार २६७ कोटी रुपये, त्यात प्राधान्याने शेतमाल उत्पादन, देखभाल व विपणन, कृषी कर्ज व संलग्न उपक्रमांचा समावेश आहे. कृषी पायाभूत सुविधा क्षेत्रासाठी २३९ कोटी रुपयांची तरतूद असून इतर पूरक क्षेत्रविकास क्षेत्रासाठी सुक्ष्म, लघु, मध्यम उद्योगांस्ठी ८०१० कोटी रुपये, निर्यात कर्ज पुरवठ्यासाठी ३६ कोटी रुपये, शिक्षणासाठी ९९ कोटी रुपये, सामाजिक पायाभूत सुविधा ७८ कोटी रुपये, उर्जा नविनीकरणासाठी ६० कोटी रुपये, इतर ४३३ कोटी रुपये असा एकूण १५ हजार २१६ कोटी रुपयांचा पत आराखडा तयार करण्यात आला आहे. गत वर्षी पत आराखडा १२ हजार ७६५ कोटी रुपयांचा होता, अशी माहिती सुरेश पटवेकर यांनी दिली.