मोफत वैद्यकीय उपचार योजनांचा लाभ घेण्यासाठी,आयुष्मान कार्ड आवश्यक- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी
छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी आयुष्मान भारत या कार्डामुळे संलग्नित रुग्णालयात मोफत आरोग्य उपचार सुविधा मिळतात. आता समाजातील सर्वच घटकांना हे आरोग्य संरक्षण लागू करण्यात आले आहे. त्यामुळे संदर्भित रुग्णालयांमध्ये मोफत उपचार योजनांचा लाभ घेण्यासाठी आयुष्मान कार्ड आवश्यक असून नागरिकांनी आपले व आपल्या कुटुंबातील सदस्यांचे आयुष्मान कार्ड नोंदणी करुन घ्यावे,असे आवाहन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी केले.
आयुष्मान कार्ड योजनेचा आढावा आज जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आला. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना, अपर जिल्हाधिकारी डॉ. अरविंद लोखंडे, निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर, जिल्हा ग्रामिण विकास यंत्रणेचे प्रकल्प अधिकारी अशोक सिरसे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभय धानोरकर, अति. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पद्मजा सराफ, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत बडे, डॉ महेश लड्डा, डॉ. बाळकृष्ण लांजेवार, डॉ. अर्चना राणे, डॉ. प्रेमलत कराड, डॉ. रवि भोपळे आदी उपस्थित होते. तसेच दुरदृष्य प्रणालीद्वारे सर्व उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, गटविकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी सहभागी झाले होते.
बैठकीत माहिती देण्यात आली की, आयुष्मान भारत कार्डवर १३५३ आजारांवर मोफत उपचार दिले जातात. त्यात सर्व वय, आर्थिक उत्पन्न गट अशा सगळ्यांचा समावेश करण्यात आला आहे. जिल्ह्यातील ५४ रुग्णालयांमध्ये या उपचार सुविधा उपलब्ध आहेत. त्यात ४७ संलग्नित खाजगी रुग्णालयांचा समावेश आहे.आरोग्यसंदर्भात समस्या उद्भवल्यास मोफत उपचार उपलब्ध होण्यासाठी आयुष्मान भारत कार्ड काढणे सगळ्यांच्या हिताचे आहे.
जिल्हाधिकारी स्वामी यांनी निर्देश दिले की, प्रत्येक नागरिकापर्यंत ही योजना पोहोचविण्यासाठी रेशन दुकानदार, आपले सरकार सेवा केंद्र, नागरी सुविधा केंद्र अशा ठिकाणी या कार्डची नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध आहे. याशिवाय विशेष शिबिरे लावून या कार्डची नोंदणी सुविधा नागरिकांना द्यावी.०००००