
असंघटीत कामगारांच्या विकासासाठी योजना राबवाव्यात – जिल्हाधिकारी आशिष येरेकर
अमरावती, प्रतिनिधी- कामगार विभागातर्फे असंघटीत क्षेत्रातील कामगारांसाठी कार्य करण्यात येत आहे. येत्या काळात कामगार आणि त्यांच्या कुटुंबांसाठी विकासाच्या योजना राबवाव्यात, असे निर्देश जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात असंघटीत कामगार, प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना, बाल कामगार कृतीदल समिती व बालकामगार सल्लागार समन्वय समिती, वेठिबगार दक्षता समिती, माथाडी व असंघटीत कामगार यांच्याबाबत आढावा घेण्यात आला. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विनय ठमके, सहायक कामगार आयुक्त श्रद्धा वाघमारे, सरकारी कामगार अधिकारी श्रीकांत झंवर, कुलदिन भोलाने आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांनी, असंघटीत क्षेत्रात काम करणारा वर्ग हा कमी उत्पन्न असलेला घटक आहे. त्यामुळे त्याला सामाजिक सुरक्षा जास्त प्रमाणात देण्यात यावी. त्यांच्या विकासासाठी असणाऱ्या योजनांमध्ये प्रामुख्याने घरासंदर्भात योजना प्रभावीपणे राबविण्यात यावी. कामगारांना त्यांच्यासाठी असलेल्या योजनांमध्ये प्रामुख्याने निवृत्तीनंतर किंवा काम सोडल्यानंतर लाभ द्यावयाचे आहेत. मात्र कामगारांचे कौशल्य विकसित करण्यावरही भर देण्यात यावा. कामगारांची आयुष्मान भारत योजनेत नोंदणी करावी, त्यामुळे त्यांना पाच लाख रूपयांचा प्रत्येक वर्षी आरोग्याचा लाभ मिळू शकेल. बाल व किशोरवयीन कामगार हे प्रामुख्याने विटभट्टीवर आढळून येतात. आतापर्यंत यात 28 जणांबाबत कारवाई करण्यात आली आहे. मेळघाटातील कामगार हे प्रामुख्याने अकोला जिल्ह्यात स्थलांतरीत होतात. त्यामुळे अमरावती आणि अकोला जिल्ह्यांनी संयुक्तपणे कारवाई करावी. कारवाईपश्चात गुन्हा दाखल झाल्यानंतरही या प्रकरणाचा कामगार विभागाने पाठपुरावा करावी. जिल्ह्यात छोटे टेक्सटाईल उद्योगामध्येही बालकामगार असण्याची शक्यता आहे. याठिकाणीही पडताळणी करण्यात यावी, असेही निर्देश श्री. येरेकर यांनी दिले.
000000



