
समता आणि बंधुत्वाचा संदेश देणारे संत रविदास महाराजांचे स्मारक ठरणार समाजासाठी प्रेरणास्थान: खासदार कल्याण काळे-जगतगुरु संत शिरोमणी रविदास महाराज स्मारक समितीतर्फे भव्य स्मारकासाठी साकडे; सामाजिक समरसता आणि एकतेचा जागर करण्याचा खासदारांचा निर्धार
जालना (प्रतिनिधी) : “ज्या संतांनी ‘मानुसकी’ हाच खरा धर्म मानला आणि संपूर्ण समाजाला समतेच्या सूत्रात बांधले, अशा जगतगुरु संत शिरोमणी रविदास महाराजांचे विचार आजही समाजाला दिशा देणारे आहेत. त्यांचे भव्य पूर्णकृती स्मारक हे केवळ एक वास्तू नसून, ते येणाऱ्या पिढ्यांसाठी सामाजिक ऐक्य आणि समरसतेचे शक्तिपीठ ठरेल,” असे प्रतिपादन खासदार कल्याण काळे यांनी केले.
नुकतेच जगतगुरु संत शिरोमणी रविदास महाराज स्मारक समितीतर्फे शिष्टमंडळाने खासदार काळे यांची भेट घेऊन भोकरदन नाका परिसरातील रविदास महाराज चौकात भव्य पूर्णाकृती स्मारक उभारण्यासाठी निवेदन दिले. यावेळी चर्चेदरम्यान संत रविदास महाराजांच्या सामाजिक क्रांतीवर प्रकाश टाकण्यात आला. ‘बेगमपुरा’ या संकल्पनेतून त्यांनी मांडलेला दुःखमुक्त आणि समतावादी समाजाचा विचार हा आजच्या काळातही अत्यंत प्रासंगिक आहे. भक्ती परंपरेला त्यांनी एका नव्या उंचीवर नेऊन ठेवले, जिथे जात-पात नाही तर केवळ भक्ती आणि कर्म श्रेष्ठ मानले जाते.
खासदार कल्याण काळे यांनी या मागणीची तातडीने दखल घेत आपली सामाजिक बांधिलकी स्पष्ट केली. ते म्हणाले, “संत रविदास महाराजांचे कार्य हे एका विशिष्ट समाजापुरते मर्यादित नसून ते संपूर्ण मानवजातीसाठी आहे. समाजात फूट पाडणाऱ्या प्रवृत्तींना रोखण्यासाठी आणि ‘एक समाज, एक राष्ट्र’ ही भावना रुजवण्यासाठी अशा महापुरुषांची स्मारके महत्त्वाची आहेत. या स्मारकाच्या उभारणीसाठी मी शासन स्तरावर सर्वतोपरी प्रयत्न करेन आणि निधी उपलब्ध करून देण्यासाठी कटिबद्ध राहीन.” खासदारांच्या या सकारात्मक भूमिकेमुळे समाजबांधवांमध्ये आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण आहे. हे स्मारक समाजातील सर्व घटकांना एकत्र आणण्याचे केंद्र बनेल आणि त्यातून संत रविदास महाराजांच्या “मन चंगा तो कठौती में गंगा” या पवित्र विचारांचा प्रचार-प्रसार होईल, असा विश्वास शिष्टमंडळाने व्यक्त केला. या प्रसंगी जगतगुरु संत शिरोमणी रविदास महाराज स्मारक समितीचे पदाधिकारी अशोक भगुरे, सचिन इरचे, विकास बिल्होरे, किशोर कुरील, देवराज डोंगरे, ज्येष्ठ कार्यकर्ते आणि तरुण उपस्थित होते.



