
नारी शक्ती वंदन अधिनियमाच्या समर्थनार्थ जालना शहरात भव्य महिला रॅली,महिलांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे – शुभांगी देशपांडे
जालना प्रतिनिधी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने संसद व राज्य विधानसभांमध्ये महिलांना 33% आरक्षण देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. महिलांच्या सशक्तीकरणासाठी, त्यांच्या राजकीय सहभागात वाढ करण्यासाठी तसेच देशाच्या सर्वांगीण विकासाला गती देण्यासाठी हा निर्णय अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे. या निर्णयाच्या समर्थनार्थ जालना शहरात भव्य महिला रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.या रॅलीचा मार्ग मामा चौक – वीर सावरकर चौक – अलंकार चौक – अग्रसेन चौक – मामा चौक असा निश्चित करण्यात आला असून, दिनांक 16 एप्रिल 2026 (गुरुवार) रोजी सकाळी 9:00 वाजता मामा चौक, जालना येथून रॅलीला प्रारंभ होणार आहे.
या पार्श्वभूमीवर जालना शहरातील सर्व घटकांतील महिलांनी—बचत गटातील महिला, शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थिनी, स्वयंसेवी संस्था (NGO) मधील कार्यकर्त्या, विविध सामाजिक संघटनांतील महिला तसेच सर्व बंधू-भगिनींनी या रॅलीत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
यावेळी शुभांगी देशपांडे यांनी प्रसिद्धी पत्रकात सांगितले आहे की, आजच्या आधुनिक युगात महिला शिक्षण, उद्योग, प्रशासन, राजकारण, क्रीडा, आरोग्य आणि सामाजिक कार्य अशा विविध क्षेत्रांमध्ये आपली ठळक ओळख निर्माण करत आहेत. 33% आरक्षणामुळे महिलांना निर्णय प्रक्रियेत अधिक प्रभावी सहभाग घेता येणार असून त्यांच्या प्रश्नांना योग्य व्यासपीठ मिळणार आहे. यामुळे सामाजिक समतेला चालना मिळून महिलांच्या सक्षमीकरणाला नवी दिशा मिळेल. महिलांनी आता केवळ सहभागी होण्यापुरते मर्यादित न राहता नेतृत्व स्वीकारण्याची वेळ आली आहे. 33% आरक्षण हा महिलांच्या अधिकाराचा आणि सन्मानाचा विजय आहे. तसेच, या ऐतिहासिक क्षणाचा भाग बनण्यासाठी जालना शहरातील प्रत्येक महिलेनं या समर्थन रॅलीत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले.



