
मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वॉर्ड रचना, प्रभाग रचनेचा निर्णय होण्याची शक्यता.
मुंबई: प्रतिनिधी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वॉर्ड रचना, प्रभाग रचनेचा निर्णय होण्याची शक्यता आहे. या संदर्भात राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचं मत जाणून घेण्यात आलं. “मंत्रिमंडळ बैठकीत काय प्रस्ताव आहे, याची मला कल्पना नाही. वॉर्ड रचना, प्रभाग रचना किंवा कुठलीही रचना केली, तरी मुंबई किंवा अन्य महापालिका निवडणुकीत आम्हाला चांगलं यश मिळणार” असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला.
“मुंबईत विशेषत: काही वॉडर्सची तोडफोड करुन, आपल्याला पाहिजे तसा वॉर्ड तयार करण्याचा प्रयत्न हा सत्ताधाऱ्यांकडून सुरु आहे. पण आम्ही सजग आहोत. निवडणुक आयोगाला कल्पना दिलीय. निवडणूक आयोगाने कृती केली नाही तर कोर्टात जाऊ” असा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी दिला.
महिला अत्याचारासंदर्भात विशेष अधिवेशन बोलवण्यासाठी राज्यपालांनी पत्र लिहिलं आहे. त्याला मुख्यमंत्र्यांनी पत्राद्वारे उत्तर दिलं, या संदर्भात फडणवीस यांना विचारले असता, ते म्हणाले की, “मुख्यमंत्री कार्यालयाचा अपरिपक्वपणा त्या पत्रातून पाहायला मिळतो. मी मुख्यमंत्री होतो. विरोधी पक्षाचं शिष्टमंडळ वेगवेगळ्या मागण्यांसाठी राज्यपालांची भेट घेतं. त्या मागण्यांवर राज्यपाल आपले पत्र जोडतात. याचा अर्थ निर्देश दिले असा होत नाही. ही पद्धत आजपासूनची नाही. गेली २५-३० वर्ष मी राजकारणात हे बघतोय”



