सुरगाणा शहराला पाणीपुरवठा करणाऱ्याबुबळी तलावातील गाळ काढण्यास सुरूवात
नाशिक, प्रतिनिधी: सुरगाणा शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या बुबळी तलावातील गाळ काढण्याच्या कामाला नगरपंचायतीच्या माध्यमातून सुरुवात झाली आहे. यामुळे सुरगाणा शहरासह परिसरातील १२ खेडी व पाड्यांच्या पाणीटंचाईच्या समस्येवर दिलासा मिळणार आहे.
सुरगाणा नगरपंचायतीचे मुख्याधिकारी सुभाष जानोरे, माजी नगराध्यक्ष तसेच संबंधित विभागीय अधिकाऱ्यांच्या बैठकीत बुबळी तलावातील गाळ काढण्याबाबत चर्चा झाली. तलावाची साठवण क्षमता वाढविण्यासाठी गाळ काढणे आवश्यक असल्याचे यावेळी निश्चित करण्यात आले. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी नमो फाऊंडेशनला आवश्यक कार्यवाहीसाठी पत्र व्यवहार केला. त्यानंतर सुरगाणा नगरपंचायतीने जलसंपदा विभागाशी समन्वय साधून प्रत्यक्ष गाळ काढण्याच्या कामास सुरुवात केलीबुबळी तलाव हा सुरगाणा शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी महत्त्वाचा स्रोत आहे. गेल्या काही वर्षांत तलावात गाळ साचल्याने साठवण क्षमतेत घट झाली होती. त्यामुळे उन्हाळ्यात शहरासह परिसरात पाणीटंचाईची समस्या निर्माण होत होती. आता गाळ काढण्याच्या कामामुळे तलावाची साठवण क्षमता वाढण्यास मदत होणार असून भविष्यात पाणीपुरवठा अधिक सक्षम होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
नगरपंचायत प्रशासनाने या कामासाठी समन्वय साधत कार्यवाही गतिमान केली असून, काम वेळेत पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. स्थानिक नागरिकांनी या उपक्रमाचे स्वागत केले आहे