मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत ग्रामपंचायत सिंगापूरची तालुकास्तरीय पडताळणीसुशासन, हरित गाव व नाविन्यपूर्ण उपक्रमांची समितीकडून पाहणी; कामकाजाबाबत समाधान व्यक्त
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत ग्रामपंचायत सिंगापूरची तालुकास्तरीय पडताळणीसुशासन, हरित गाव व नाविन्यपूर्ण उपक्रमांची समितीकडून पाहणी; कामकाजाबाबत समाधान व्यक्त
ठाणे, प्रतिनिधी(जिल्हा परिषद, ठाणे) : मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान सन २०२५-२६ अंतर्गत तालुकास्तरीय पडताळणी समितीचा दौरा दि. १४ मे, २०२६ रोजी ग्रामपंचायत सिंगापूर, ता. मुरबाड, जि. ठाणे येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. या दौऱ्यादरम्यान ग्रामपंचायतीमार्फत राबविण्यात आलेल्या विविध विकासकामांची व नाविन्यपूर्ण उपक्रमांची समितीने सविस्तर पाहणी केली.
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत सुशासनयुक्त ग्रामपंचायत, सक्षम पंचायत, जलसमृद्ध, स्वच्छ व हरित गाव, मनरेगा व इतर योजनांचे अभिसरण, गावपातळीवरील संस्था सक्षमीकरण, उपजीविका विकास, सामाजिक न्याय, लोकसहभाग व श्रमदानातून लोकचळवळ निर्माण करणे तसेच नाविन्यपूर्ण उपक्रम या विविध निकषांच्या आधारे ग्रामपंचायतीच्या कामकाजाचे मूल्यांकन करण्यात आले.
यावेळी ग्रामपंचायत सिंगापूरने राबविलेल्या वाचनालय उपक्रम, सौर पथदिवे उभारणी, सर्व शासकीय इमारतींवर सोलर नेट मीटर जोडणी, वृक्षलागवड व वृक्षसंवर्धन या उपक्रमांची समितीने विशेष दखल घेतली. ग्रामपंचायतीने पर्यावरणपूरक व शाश्वत विकासाच्या दृष्टीने केलेली कामे उल्लेखनीय असल्याचे मत समिती सदस्यांनी व्यक्त केले. तसेच ग्रामविकासासाठी राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांबाबत समाधान व्यक्त करून ग्रामपंचायतीला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
या तालुकास्तरीय पडताळणी समितीत समिती प्रमुख श्री. डी. जी. जाधव (गटविकास अधिकारी, पंचायत समिती भुसावळ, जि. जळगाव), श्री. गौतम वाडे (विस्तार अधिकारी पंचायत), श्री. संजय भारंबे (ग्रामपंचायत अधिकारी), श्री. सुनील मोरे (केंद्रप्रमुख), श्री. सी. पी. पाटील (आरोग्य सहाय्यक) तसेच श्री. हर्षल येवले (डेटा ऑपरेटर) यांनी सहभाग घेतला.याप्रसंगी ग्रामपंचायत सिंगापूरचे सरपंच, उपसरपंच, सर्व सदस्य, ग्रामपंचायत अधिकारी, मुख्याध्यापक, पोलीस पाटील, आशा सेविका, सीआरपी, अंगणवाडी सेविका व मदतनीस, गावपातळीवरील कर्मचारी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाच्या माध्यमातून ग्रामपंचायतींमध्ये सुशासन, पारदर्शकता, पर्यावरण संवर्धन व लोकसहभाग वाढवून गावांचा सर्वांगीण विकास साधण्याचा उद्देश असल्याचे यावेळी सांगण्यात आले.