नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य; नाणेघोळ येथील ६७ नागरिकांचे सुरक्षित स्थलांतर डोंगराला भेगा पडल्याचे निदर्शनास येताच प्रशासनाची तत्पर कार्यवाही..
रायगड-अलिबाग, प्रतिनिधी : मौजे नाणेघोळ येथे डोंगराला भेगा पडल्याचे निदर्शनास आल्यानंतर संभाव्य धोका लक्षात घेऊन प्रशासनाने तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना केली आहे. नागरिकांच्या जीविताच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत येथील एकूण ६७ नागरिकांचे केवनाळे सोनारवाडी येथे सुरक्षित स्थलांतर करण्यात आले आहे.
जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसाच्या पार्श्वभूमीवर डोंगराला पडलेल्या भेगांमुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून तातडीने स्थलांतराची कार्यवाही केली. स्थलांतरित करण्यात आलेल्या नागरिकांमध्ये ३० महिला, ३२ पुरुष आणि ५ मुलांचा समावेश आहे. प्रशासनाच्या सतर्कतेमुळे आणि वेळीच करण्यात आलेल्या कार्यवाहीमुळे सर्व नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात यश आले आहे.
संभाव्य धोक्याची माहिती मिळताच संबंधित यंत्रणांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून नागरिकांच्या सुरक्षित स्थलांतरासाठी समन्वयाने कार्यवाही केली. विशेषतः महिला, लहान मुले आणि अन्य नागरिकांच्या सुरक्षिततेची काळजी घेत स्थलांतराची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.
केवनाळे सोनारवाडी येथे स्थलांतरित नागरिकांची आवश्यक व्यवस्था करण्यात आली असून प्रशासनाकडून परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवण्यात येत आहे. पावसाची स्थिती आणि डोंगर परिसरातील संभाव्य धोका लक्षात घेऊन संबंधित यंत्रणा सतर्क ठेवण्यात आल्या आहेत.
आपत्तीच्या काळात नागरिकांनी घाबरून न जाता प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, धोकादायक ठिकाणी जाणे टाळावे तसेच डोंगराला भेगा पडणे, दरड कोसळण्याची शक्यता किंवा अन्य कोणतीही धोकादायक बाब निदर्शनास आल्यास त्याची माहिती तातडीने स्थानिक प्रशासनाला द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.नागरिकांची सुरक्षितता प्रथम या भूमिकेतून प्रशासनाने केलेल्या या तत्पर आणि प्रतिबंधात्मक कार्यवाहीमुळे संभाव्य धोका टाळण्यात आला असून सर्व ६७ नागरिक सुरक्षित आहेत.