जालना : प्रतिनिधी- 78 व्या निरंकारी संत समागमाच्या समारोपानंतर समालखा मधील त्याच भव्य मैदानावर सतगुरु माता सुदीक्षाजी महाराज आणि निरंकारी राजपिता रमितजी यांच्या पावन उपस्थितीत निरंकारी सामूहिक विवाह सोहळा आपल्या साधेपणाची परंपरा जपत यावर्षीही आयोजित करण्यात आला. या प्रसंगी नवविवाहित जोडपे परिणयसूत्रात बांधले गेले आणि त्यांनी आपल्या नवजीवनाच्या मंगल प्रारंभासाठी सतगुरुंचे शुभ आशीर्वाद देखील प्राप्त केले. हा सोहळा अत्यंत अनुपम आणि प्रेरणादायी ठरला, ज्यामध्ये भारतातील विविध राज्यांमधून बिहार, चंदीगड, दिल्ली, गुजरात, हिमाचल प्रदेश, हरियाणा, जम्मू-कश्मीर, झारखंड, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, पंजाब, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड यांसह परदेशातील ऑस्ट्रेलिया आणि कॅनडा येथून आलेल्या 126 नवजोडप्यांनी सहभाग नोंदविला. या पवित्र प्रसंगी सर्व 126 वर-वधू एकाच स्थानावरून एकात्मता आणि साधेपणाचा सुंदर संदेश देत परिणयसूत्रात बांधले गेले. या वेळी मिशनचे वरिष्ठ अधिकारी, वर-वधूंचे कुटुंबीय आणि श्रद्धाळू भक्तगणांनी या दिव्य आणि भावनिक दृश्याचा भरभरून आनंद प्राप्त केला. कार्यक्रमाची सुरुवात पारंपरिक जयमाला आणि निरंकारी परंपरेतील सामाईक पुष्पहार या विधीने झाली. त्यानंतर भक्तिभावाने ओथंबलेल्या वातावरणात निरंकारी लावांचे हिंदी भाषेत गायन करण्यात आले, ज्यातील प्रत्येक ओळ नवविवाहितांसाठी आध्यात्मिक संदेश आणि गृहस्थ जीवनाच्या कल्याणकारी शिकवणींनी परिपूर्ण होती. सोहळ्यादरम्यान सतगुरु माताजी आणि निरंकारी राजपिताजींनी नवविवाहित जोडप्यांवर पुष्पवृष्टी करून त्यांना सुखमय, आनंदमय आणि समर्पणमय जीवनाचे आशीर्वाद दिले. हा सोहळा दरवर्षीप्रमाणे या वर्षीही आपला साधेपणा, समरसता आणि एकात्मतेच्या दिव्य संदेशाने उजळून निघाला. हा समारंभ जात, धर्म, भाषा आणि प्रांतीय भेदभाव याच्या पलीकडे जाऊन मानवतेचे सुंदर, सर्वसमावेशक आणि प्रेरणादायी स्वरूप प्रकट करणारा ठरला. सतगुरु माताजींनी नवविवाहित जोडप्यांना आशीर्वाद देताना सांगितले, की आजच्या या पवित्र प्रसंगी सर्व जोडपी सुंदर स्वरूपात सजली आहेत. विवाहित जीवनाची सार्थकता आणि महत्व यावर प्रकाश टाकताना सतगुरु माताजी म्हणाल्या, की हा सोहळा म्हणजे केवळ एक दिवसाचा उत्सव नसून प्रेम, सन्मान आणि सहकार्याने भरलेल्या पवित्र मिलनाचे प्रतीक आहे. विवाहित जीवनात हे समानतेचा आणि सहभागाचा संदेश देणारे आहे. जसे लावांमध्ये सांगितले गेले आहे, की जर आध्यात्मिक प्रयत्नात एकाचा सहभाग कमी असेल, तर दुसर्याने त्याला प्रोत्साहन द्यावे, जेणेकरून जीवनाची यात्रा संतुलन आणि सामंजस्याने पुढे सुरू राहील.
सतगुरु माताजींनी हेही स्पष्ट केले, की विवाह हा केवळ दोन व्यक्तींचे मिलन नसून दोन कुटुंबांचा पवित्र संगम आहे. या मिलनात दोन्ही पक्ष आपल्या सामाजिक आणि कौटुंबिक जबाबदार्या पार पाडत सेवा, सत्संग, सुमिरण आणि भक्ती मार्गावरील महत्त्वाची कर्तव्ये देखील पार पडतात. शेवटी सतगुरु माताजींनी नवविवाहितांच्या वैवाहिक जीवनासाठी मंगलकामना करत प्रार्थना केली, की निरंकार प्रभूची अनंत कृपा सर्वांवर राहो,
आणि हे पवित्र मिलन आनंद, प्रेम आणि सलोख्याचे प्रतीक बनून आयुष्यभर टिकून राहो.
संत निरंकारी मंडळाचे सचिव आदरणीय श्री. जोगिंदर सुखीजाजी यांनी माहिती देताना सांगितले, की समाजकल्याण विभागाच्या सहकार्याने या वर्षी सतगुरु माताजींच्या पावन सान्निध्यात सुमारे 126 जोडपी ही केवळ भारताच्या विविध राज्यांतून नव्हे, तर परदेशांमधूनही सहभागी झाली आहेत.