ग्राहकांनी सजग राहून सुरक्षित व्यवहाराची सवय अंगीकारावी – न्यायाधीश सय्यद सादिक अली तहसील कार्यालयात जागतिक ग्राहक दिन उत्साहात संपन्न
अहिल्यानगर, – प्रतिनिधी ग्राहकांनी आपल्या हक्कांविषयी जागरूक राहून सुरक्षित व जबाबदार व्यवहाराची सवय अंगीकारणे अत्यंत आवश्यक आहे. बाजारपेठेतील फसवणुकीपासून बचाव करण्यासाठी सजग ग्राहक हीच सर्वात मोठी ताकद आहे, असे प्रतिपादन न्यायाधीश तथा जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे अध्यक्ष सय्यद सादिक अली यांनी केले.
तहसील कार्यालय, अहिल्यानगर येथे आयोजित तालुकास्तरीय “जागतिक ग्राहक दिन” कार्यक्रमात ते मार्गदर्शन करताना बोलत होते. यावेळी जिल्हा ग्राहक मंचच्या सदस्या चारु डोंगरे, संध्या कसबेकर, तहसीलदार संजय शिंदे, वकील संघाचे अध्यक्ष सुनील मुंदडा, पोलीस निरीक्षक शंभुवेल गायकवाड, उपनियंत्रक आर. डी. दराडे, जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेचे सदस्य विलास जगदाळे, अमिता कोहली, डॉ. विलास सोनवणे, डॉ. कळमकर, प्रकाश रासकर, बाबासाहेब भालेराव, अशोक शेवाळे, संभाजी सुळ, तालुका पुरवठा अधिकारी शिवराज पवार, नायब तहसीलदार गणेश भानवसे, निवासी नायब तहसीलदार गौरव दळवी आदी उपस्थित होते.
न्यायाधीश सय्यद सादिक अली म्हणाले की, ग्राहक हा बाजारपेठेचा केंद्रबिंदू असून त्याच्या हक्कांचे संरक्षण करणे ही समाजाची सामूहिक जबाबदारी आहे. ग्राहक संरक्षण कायद्यामुळे नागरिकांना अन्यायकारक व्यापार पद्धती, निकृष्ट दर्जाच्या वस्तू किंवा अपुरी सेवा यांविरुद्ध न्याय मिळविण्यासाठी प्रभावी व्यासपीठ उपलब्ध झाले आहे
कोणतीही वस्तू किंवा सेवा खरेदी करताना बिल घेणे, उत्पादनावरील माहिती तपासणे, उत्पादनाची अंतिम मुदत पाहणे तसेच योग्य वजन-मापाची खात्री करणे अत्यंत आवश्यक आहे. ग्राहकांनी फसवणूक, चुकीचे मोजमाप, जादा दर आकारणी किंवा निकृष्ट दर्जा आढळल्यास संबंधित प्राधिकरणाकडे तक्रार नोंदवावी.ऑनलाइन व्यवहारांचे प्रमाण वाढत असताना डिजिटल फसवणुकीचे प्रकारही वाढत आहेत. अज्ञात लिंक, संशयास्पद संदेश, अवास्तव सवलतींच्या ऑफर्स किंवा अनोळखी कॉल यापासून सावध राहणे आवश्यक आहे. आपली वैयक्तिक व बँकिंग माहिती कोणालाही देऊ नये, असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमात ग्राहकांचे हक्क, सुरक्षित व्यवहार, योग्य वजन-मापे, बिल घेण्याचे महत्त्व तसेच ग्राहक संरक्षण कायद्यांतर्गत उपलब्ध तक्रार निवारण यंत्रणेची सविस्तर माहिती उपस्थितांना देण्यात आली. ग्राहकांनी आपल्या अधिकारांची जाणीव ठेवून त्यांचा योग्य वापर करावा, असेही आवाहन करण्यात आले.