लातूर जिल्ह्यात पुढील पाच दिवस पावसाचा ‘येलो अलर्ट’; नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन
राज्य प्रतिनिधी-भारतीय हवामान विभाग, मुंबई यांनी वर्तविलेल्या अंदाजानुसार, लातूर जिल्ह्यात पुढील पाच दिवस म्हणजेच १८ ते २२ एप्रिल २०२६ या कालावधीत हवामानात मोठा बदल होण्याची शक्यता आहे. या काळात जिल्ह्यात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह आणि मेघगर्जनेसह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता असल्याने पावसाचा ‘येलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. पावसासोबतच जिल्ह्यामध्ये ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने सोसाट्याचा वारा वाहण्याची दाट शक्यता आहे. या नैसर्गिक आपत्तीच्या पार्श्वभूमीवर जीवित व वित्तहानी टाळण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.
नागरिकांनी मेघगर्जना किंवा विजांचा कडकडाट सुरू असताना नागरिकांनी उघड्यावर थांबणे टाळावे. विजा चमकत असताना झाडाखाली, विजेच्या खांबाजवळ, ट्रान्सफॉर्मर किंवा कोणत्याही उंच वस्तूंजवळ आश्रय घेऊ नये. शेतात काम करणाऱ्या शेतकरी व शेतमजुरांनी हवामानातील बदल जाणवताच तात्काळ सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा. वादळी वाऱ्यामुळे घरावरील सैल पत्रे, जाहिरात फलक किंवा झाडांच्या फांद्या पडून अपघात होण्याची शक्यता असते. अशा वस्तूंना वेळीच सुरक्षित करावे. तसेच नागरिकांनी कोणत्याही अनधिकृत माहितीवर किंवा सोशल मीडियावरील अफवांवर विश्वास ठेवू नये. जिल्हा प्रशासनामार्फत वेळोवेळी दिल्या जाणाऱ्या अधिकृत सूचनांचेच पालन करावे.
जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत जिल्ह्यातील परिस्थितीवर सतत लक्ष ठेवण्यात येत आहे. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी तात्काळ स्थानिक प्रशासन किंवा जिल्हा नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्यावतीने करण्यात आले आहे.