धुळे व नंदुरबार जिल्हे भविष्यातील प्रमुख औद्योगिक केंद्रे बनणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शिरपूरला स्व. तपनभाई पटेल मेमोरिअल हॉस्पिटलसह विविध विकासकामांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन
धुळे व नंदुरबार जिल्हे भविष्यातील प्रमुख औद्योगिक केंद्रे बनणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शिरपूरला स्व. तपनभाई पटेल मेमोरिअल हॉस्पिटलसह विविध विकासकामांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन..
धुळे, द प्रतिनिधी
: शिरपूर तालुक्यात महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या माध्यमातून औद्योगिक वसाहत स्थापन करण्यासाठी पुढाकार घेण्यात येईल आणि अरुणावती नदीवर बंधारे बांधण्यास मान्यता देण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. धुळे जिल्ह्यामध्ये गेल्या दीड वर्षात तब्बल ४० हजार कोटी रुपयांची मोठी गुंतवणूक आली असून, भविष्यात धुळे आणि नंदुरबार हे जिल्हे राज्याची प्रमुख औद्योगिक केंद्रे बनतील, असा विश्वासही श्री. फडणवीस यांनी व्यक्त केला
मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते आज दुपारी स्व. तपनभाई पटेल मेमोरिअल हॉस्पिटलचे उद्घाटन झाले. त्यानंतर आर. सी. पटेल औषधनिर्माण शास्त्र महाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजित श्री विलेपार्ले केळवणी मंडळ संचलित विविध शैक्षणिक संस्था, औद्योगिक उपक्रमांचे उद्घाटन व भूमिपूजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.कार्यक्रमाला राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, आमदार अमरिशभाई पटेल, आमदार काशिराम पावरा, आमदार शिरीष नाईक, आमदार राघवेंद्र पाटील, आमदार अनुप अग्रवाल, आमदार राजेश पाडवी, आमदार मंजुळा गावित, आमदार आमश्या पाडवी, धुळ्याच्या महापौर माया परदेशी, माजी खासदार डॉ.सुभाष भामरे, डॉ. हीना गावित, शिरपूरचे नगराध्यक्ष चिंतनभाई पटेल, भुपेशभाई पटेल आदी उपस्थित होते.यावेळी मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयाने विकसित एआय आधारित ई-सुविधा पोर्टलचे लोकार्पण, आयुर्वेदिक कॉलेज, ॲग्रीकल्चर कॉलेज व फार्मसी कॉलेज, तरडी, आर. सी. पटेल इंग्लिश मीडियम स्कूल, निमझरीचे सुदूर यंत्रणेद्वारे उद्घाटन, खर्दे येथील वैद्यकीय महाविद्यालय इमारत, नटवाडे येथील याहामोगा माता मंदिर, क्रांतिवीर भगवान बिरसा मुंडा स्मारक आणि क्रांतिवीर खाज्या नाईक स्मारक आणि दहिवदच्या मोटार ड्रायव्हिंग स्कूलचे भूमिपूजन करण्यात आले.
मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, स्वातंत्र्यानंतरच्या काळात अन्न, वस्त्र आणि निवाऱ्यासोबतच आता शिक्षण, आरोग्य व रोजगार या प्रमुख गरजा बनल्या आहेत. याच त्रिसूत्रीवर भर देत शिरपूरने साधलेला विकास राज्यासाठी दिशादर्शक आहे. एकविसाव्या शतकात उद्योग केवळ पैशावर नाही, तर कुशल मनुष्यबळावर चालतात. शिरपूरमध्ये उभारण्यात आलेल्या अभियांत्रिकी, औषधनिर्माण आणि कृषी महाविद्यालयांमुळे हे शहर आता उत्कृष्ट मानवी संसाधन पुरवणारे मोठे केंद्र बनले आहे. तसेच, मुंबई किंवा पुण्यासारख्या मोठ्या शहरांच्या तोडीचे अत्याधुनिक रुग्णालय आदिवासी भागात उभारून जनतेला दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याचे कार्य अत्यंत कौतुकास्पद असल्याचे त्यांनी नमूद केले. शिरपूर येथे आयटी पार्कसाठी अँकर इन्व्हेस्टर शोधून त्याच्याशी आयटी पार्कबाबत चर्चा करण्यात येईल व आयटी पार्क उभारण्याबाबत प्रयत्न करण्यात येईल, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
शिरपूर येथे आदिवासी भागातील विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणारी ‘सुपर ५०’ योजना त्यांच्यात नवा आत्मविश्वास निर्माण करत आहे. खऱ्या अर्थाने आदिवासी कल्याणाची संकल्पना येथे प्रत्यक्षात उतरताना दिसत आहे. यासोबतच, जगातील प्रगत देशांना दर्जेदार कापड पुरवणारा वस्त्रोद्योग प्रकल्प आणि ‘शिरपूर पॅटर्न’च्या जलसंधारण कामांमुळे दुष्काळी भाग पाणीदार होण्यासोबत परिसराचा विकास झाल्याचा विशेष उल्लेख मुख्यमंत्र्यांनी केला.