जिद्द आणि कष्टाच्या जोरावर रात्रीचे शिक्षण घेणारे विद्यार्थी नव्या भारताचे आधारस्तंभ – प्राचार्य डॉ. धनंजय पष्टे
ठाणे – प्रतिनिधी -गुडविल इंटरनॅशनल फाउंडेशन संचलित श्री जया आनंद कॉमर्स अँड सायन्स नाईट कॉलेजमध्ये नुकताच पदवीदान समारंभ आणि टी.वाय. विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ अत्यंत उत्साही आणि भावूक वातावरणात पार पडला. ‘दिवसा काम आणि रात्री शिक्षण’ घेणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांनी याप्रसंगी आपली पदवी स्वीकारून यशाची मोहोर उमटवली
कार्यक्रमाचे उद्घाटन संस्थेच्या आधारस्तंभ सौ. नंदिनी राजन विचारे यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षण क्षेत्रातील ज्येष्ठ तज्ज्ञ आणि निवृत्त शिक्षण उपसंचालक श्री. व्ही. के. वानखेडे, फाउंडेशनचे अध्यक्ष योगेश सावंत, सचिव स्वप्नील चव्हाण आणि मान्यवर अतिथी D.D.M. School & Junior College च्या मुख्याध्यापिका सौ. प्रणाली पातडे उपस्थित होत्या.
सन २०२३-२४ आणि २०२४-२५ या दोन सत्रांतील वाणिज्य आणि विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पदवी प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली. काळ्या गाऊनमधील पदवीधरांच्या चेहऱ्यावरील आनंद यावेळी ओसंडून वाहत होता. प्रमाणपत्र स्वीकारण्यापूर्वी विद्यार्थ्यांनी पदवीदान शपथ घेतली, ज्यामध्ये देशसेवा आणि नैतिक मूल्यांच्या जपणुकीचा संकल्प करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात श्री जय आनंद रात्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. धनंजय पष्टे यांनी नव्या शैक्षणिक धोरणावर प्रकाश टाकला. ते म्हणाले की, “राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) २०२० मुळे नाईट कॉलेजमधील विद्यार्थ्यांना आता बहुविद्याशाखीय कौशल्ये आत्मसात करण्याची संधी मिळाली असून, हे धोरण त्यांना केवळ पदवीधारक न बनवता जागतिक बाजारपेठेसाठी सक्षम ‘व्यावसायिक’ म्हणून घडवत आहे. दिवसा काम आणि रात्री अभ्यास करणाऱ्या आमच्या विद्यार्थ्यांची जिद्दच त्यांना भविष्यातील आव्हानांवर मात करण्यासाठी आणि उज्ज्वल करिअर घडवण्यासाठी खरी शक्ती प्रदान करेल.कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात २०२५-२६ च्या टी.वाय. बॅचचा निरोप समारंभ पार पडला. यावेळी नंदिनी विचारे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, “नाईट कॉलेजमध्ये शिकणे हे खडतर असते, पण हीच परिस्थिती तुम्हाला जगण्याचे शिक्षण देते. इथून बाहेर पडताना तुम्ही केवळ पदवी घेऊन जात नाही आहात, तर एक प्रबळ आत्मविश्वास घेऊन जात आहात.
निरोप समारंभाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कलागुण सादर केले. प्रा. हर्षदा राजपुरे आणि प्रा. संकेत जुवळे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले, तर सुत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन महाविद्यालयाच्या शिक्षक वृंदानी केले. कार्यक्रमाची सांगता अत्यंत शिस्तबद्ध वातावरणात राष्ट्रगीताने झाली