रायगड जिल्ह्यात १८ मे अखेर ६४ टँकरद्वारे पाणीपुरवठा६४ गावे व २३० वाड्यांतील १ लाख १३ हजार ७०९ नागरिकांना दिलासा…
रायगड-अलिबाग, प्रतिनिधी) :- जिल्ह्यात वाढत्या उष्णतेमुळे निर्माण झालेल्या पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद रायगडच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागामार्फत विविध तालुक्यांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. दि.१८ मे २०२६ अखेर जिल्ह्यात एकूण ६४ टँकर कार्यरत असून त्याद्वारे ६४ गावे व २३० वाड्यांमधील १ लाख १३ हजार ७०९ नागरिकांना पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यात येत आहे.
जिल्ह्यातील सर्व टँकर खासगी स्वरूपातील असून शासकीय टँकर अथवा मदतीचे टँकर कार्यरत नाहीत. सर्वाधिक टंचाईग्रस्त परिस्थिती पेण तालुक्यात असून येथे ९ गावे व ७६ वाड्यांसाठी १२ टँकर कार्यरत आहेत. या माध्यमातून २४ हजार ७६५ नागरिकांना पाणीपुरवठा केला जात आहे.
महाड तालुक्यात १४ गावे व ८७ वाड्यांसाठी ९ टँकरद्वारे २२ हजार २४३ नागरिकांना पाणीपुरवठा सुरू आहे. पनवेल तालुक्यात १० गावे व ८ वाड्यांसाठी ९ टँकरद्वारे १८ हजार ५५३ नागरिकांना पाणीपुरवठा केला जात आहे. कर्जत तालुक्यात ३ गावे व ११ वाड्यांसाठी ८ टँकर, खालापूर तालुक्यात ५ गावे व ९ वाड्यांसाठी ६ टँकर, तर माणगाव तालुक्यात ४ गावे व १५ वाड्यांसाठी ५ टँकर कार्यरत आहेत.
याशिवाय अलिबाग तालुक्यात ४ गावे, उरण तालुक्यात ४ वाड्या, सुधागड-पाली तालुक्यात २ वाड्या, रोहा तालुक्यात ३ गावे, पोलादपूर तालुक्यात ५ गावे व १४ वाड्या, म्हसळा तालुक्यात ६ गावे व १ वाडी, तसेच श्रीवर्धन तालुक्यात १ गाव व ३ वाड्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे.
जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा प्रशासन व जिल्हा परिषदेकडून पाणीटंचाईग्रस्त भागांवर सातत्याने लक्ष ठेवण्यात येत असून आवश्यकतेनुसार अतिरिक्त टँकर उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासन सज्ज आहे. नागरिकांना नियमित व सुरळीत पाणीपुरवठा मिळावा यासाठी संबंधित यंत्रणा समन्वयाने कार्यरत असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.