काशीद समुद्रकिनारी पुन्हा दोन पर्यटकांचे प्राण वाचवण्यात यश…
रायगड-अलिबाग, प्रतिनिधी : काशीद समुद्रकिनारी आज सायंकाळी आणखी एक मोठी दुर्घटना टळली असून, दोन पर्यटकांना बुडण्यापासून वाचवण्यात प्रशासनाला यश आले आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणामार्फत उपलब्ध करून देण्यात आलेल्या “रोबोटिक बोयो”च्या मदतीने हे बचावकार्य यशस्वीरीत्या पार पडले.
आज दिनांक 22 मे 2026 रोजी सायंकाळी सुमारे 6.35 वाजताच्या दरम्यान काशीद बीच येथे पुणे जिल्ह्यातील शिखरापूर येथील अथर्व वरक्ष गायकवाड (वय 19) आणि सुमित राजाराम भुजबळ (वय 17) हे समुद्रात पोहत असताना खोल पाण्याकडे ओढले जाऊ लागले. संबंधित प्रकार लक्षात येताच कर्तव्यावर असलेले पोलीस शिपाई प्रविण रोटकर व जितेंद्र माने यांनी तत्काळ धाव घेतली.
परिस्थितीचे गांभीर्य ओळखून त्यांनी लाईफगार्ड सौदागर आणि शुभम लाड यांच्या मदतीने “रोबोटिक बोयो”च्या सहाय्याने दोन्ही पर्यटकांना सुखरूप बाहेर काढले. या तात्काळ आणि धाडसी बचावकार्यातून दोन युवकांचे प्राण वाचले असून, उपस्थित पर्यटकांनी प्रशासन, पोलीस कर्मचारी आणि लाईफगार्ड पथकाचे कौतुक केले.
काशीद समुद्रकिनारी वाढत्या पर्यटकांच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने उपलब्ध करून दिलेल्या आधुनिक “रोबोटिक बोयो” उपकरणामुळे आपत्कालीन परिस्थितीत त्वरित मदत मिळत असून, त्याची उपयुक्तता पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.