
संत रोहिदास वाडा ‘कल्याणचा राजा’ सार्वजनिक गणेश मंडळाच्या वतीने भाविकांना गणेशदर्शनाचे आवाहन
कल्याण, प्रतिनिधी : बैलबाजार, कल्याण परिसरातील संत रोहिदास वाडा गणेशोत्सव मित्र मंडळाची स्थापना २४ मार्च १९५३ रोजी झाली असून, यंदा मंडळाचा ७४ वा गणेशोत्सव उत्साहात साजरा करण्यात येत आहे. गेल्या अनेक दशकांपासून गणेशोत्सवासोबतच विविध समाजोपयोगी, सांस्कृतिक आणि प्रबोधनात्मक उपक्रम सातत्याने राबविण्याची परंपरा मंडळाने जपली आहे.
यंदाच्या गणेशोत्सवानिमित्त मंडळाच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. १६ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता ‘अंधश्रद्धा निर्मूलन : चमत्कारामागील विज्ञान आणि प्रबोधन’ या विषयावर प्रबोधनात्मक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. तसेच १८ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात आले आहे. याशिवाय महिला व मुलांसाठी विविध मनोरंजनात्मक आणि सांस्कृतिक कार्यक्रमही आयोजित करण्यात आले आहेत.
मंडळाने यंदाही आपला अभिनव पर्यावरणपूरक उपक्रम कायम ठेवला आहे. गणेशदर्शनासाठी येणाऱ्या सन्माननीय पाहुण्यांचे पारंपरिक पद्धतीने शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन स्वागत न करता त्यांना झाडांचे रोप भेट देऊन स्वागत करण्यात येते. पर्यावरण संवर्धनाचा संदेश समाजापर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने मंडळाने हा उपक्रम सुरू ठेवला आहे.
गणेशोत्सवाच्या निमित्ताने भाविकांनी ‘कल्याणचा राजा’चे दर्शन घेऊन मंडळाच्या विविध सामाजिक, प्रबोधनात्मक व सांस्कृतिक उपक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष यश वाळंज, उपाध्यक्ष ओमकार वाळंज तसेच सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केले आहे.



