
भारतीय लष्कराची भूमिका स्पष्ट असून देशाच्या सीमांमध्ये एकतर्फी बदल करण्याचा प्रयत्न खपवून घेतला जाणार नाही.’’ असे मत लष्करप्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे
नवी दिल्ली प्रतिनिधी : ‘‘ भारतीय लष्कराची भूमिका स्पष्ट असून देशाच्या सीमांमध्ये एकतर्फी बदल करण्याचा प्रयत्न खपवून घेतला जाणार नाही.’’ असे मत लष्करप्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे यांनी आज मांडले. लष्कर दिनाच्या निमित्ताने येथे आयोजित संचलनप्रसंगी बोलताना त्यांनी मागील वर्ष हे लष्करासाठी खूप आव्हानात्मक होते असे सांगतानाच ईशान्येकडील सीमांवरील अस्वस्थतेचा हवाला दिला.नरवणे म्हणाले की, ‘‘ सीमेवरील तणाव नियंत्रणात ठेवण्यासाठी भारत आणि चीनदरम्यानची लष्करी चर्चेची चौदावी फेरी नुकतीच पार पडली होती. आतापर्यंत या आघाड्यांवर प्रयत्न झाल्याने विविध भागांतून चीनने माघार घेतली असून हे एक सकारात्मक पाऊल मानावे लागेल. सध्या निर्माण झालेल्या तणावाबाबत उपाय शोधण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
हिमाच्छादित पर्वतावर तैनात असलेल्या जवानांचे मनोधैर्य देखील पर्वताएवढेच उंच आहे. आमच्या संयमातून स्वतःवरील आत्मविश्वास दिसून येतो पण अन्य लोकांनीतो आजमावून पाहण्याची चूक करू नये. भारतीय लष्कर देशाच्या सीमांच्या रचनेतील एकतर्फी बदल कोणत्याही स्थितीमध्ये मान्य करणार नाही.’’‘ड्रॅगन’शी संघर्षपॅंगाँग तळ्याच्या परिसरातील रक्तरंजित संघर्षानंतर ५ मे २०२० पासून लडाखमध्ये भारत आणि चीन यांचे सैन्य आमनेसामने आले असून हा तणाव कमी व्हावा म्हणून दोन्ही देशांदरम्यान आतापर्यंत चर्चेच्या चौदा फेऱ्या पार पडल्या आहेत. सीमेवरील तणाव काही अंशी कमी झाला असला तरी ड्रॅगन वारंवार फुत्कार टाकत असतो.



