सोशल मिडीयापेक्षा वृत्तपत्रातील बातमींवर जास्त विश्वास – अॅड. आश्विनी धन्नावत,मराठा महासंघ व पीसीएम जालनाच्यावतीने जाहीरात प्रतिनिधींचा सन्मान प्रिंट मिडिया डेव्हलपमेंट 2025 चा पुरस्काराने नरेश कोरडे सन्मानित
जालना । प्रतिनिधी – कुणी काही सांगितले अथवा सोशल मिडीयावरील वृत्तांपेक्षा वृत्तपत्रांमध्ये छापून आलेल्या बातम्यांवर आमचा जास्त विश्वास असल्याचे प्रतिपादन अॅड. आश्विनी धन्नावत यांनी येथे केले.
मराठा महासंघ व पीसीएम जालनाच्यावतीने जाहीरात प्रतिनिधी व पत्रकारांचा सन्मान सोहळा सोमवार (दि 13) रोजी रेल्वे स्टेशन जवळील कृष्णा प्लाझा येथे आयोजित करण्यात आला होता. त्या प्रसंगी अॅड. आश्विनी धन्नावत बोलत होत्या. यावेळी अॅड. भास्कर मगरे, प्रेस कॉन्सील ऑफ महाराष्ट्रचे (पीसीएम) राज्य सरचिटणीस महेश जोशी, विजय सकलेचा, हिंदु महासभेचे धनसिंह सुर्यवंशी, मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक अशोक पडुळ, मराठा महासंघाचे अरविंद देशमुख, पीसीएमचे जालना जिल्हाध्यक्ष दीपक शेळके यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन त्यांचे अभिवादन करण्यात आले.
पुढे बोलतांना अॅड. धन्नावत म्हणाल्या की, लोकशाहीतील महत्त्वाचा चौथा स्तंभ पत्रकार म्हणून आपण आहात आपल्यावर मोठी जबाबदारी आहे. कुणी सांगितले, किंवा सोशल मिडीयावर, व्हॉटस्अपवर देखील आम्ही विश्वास ठेवत नाही. यासंदर्भात त्यांनी एक व्हॉटस्अपवरील मॅसेजचे उदाहरण देत. वृत्तपत्रांवरील बातमींवर आम्हाला जास्त विश्वास असल्याचेही अॅड. धन्नावत यांनी म्हटले. जाहीरातींमुळे वृत्तपत्रे टिकली आहेत. फायनान्स हा सर्वात महत्त्वाचा भाग आहे आणि वृत्तपत्रात जाहीरात मिळवून देणारे प्रतिनिधी हे वृत्तपत्राचा कणा असल्याचेही त्या म्हणाल्या. विधी संसर्ग बालकावरील वृत्त छापतांना त्यांचे नाव, ठिकाण छापू नका, त्यांची ओळख पटेल असे वृत्त देऊ नका असा सल्ला देतांना असे वृत्त आल्यास अशा विधीसंसर्ग बालकांचे पुढील आयुष्य उद्धव्स्त होऊ शकते याबाबतीत काळजी घेण्याचा सल्लाही पत्रकारांना यावेळी अॅड. धन्नावत यांनी दिला.
अॅड. भास्कर मगरे म्हणाले की, आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी सहा जानेवारी रोजीच दर्पण वृत्तपत्र काढले होते तेव्हा पासून मराठी पत्रकारिता पुढे आली आहे. दर्पण दिनाच्या सर्व पत्रकारांना त्यांनी शुभेच्छा दिल्या ते म्हणाले की, कालातरांने मराठी पत्रकारितेला सदृढ, समृद्ध करण्याचे कार्य आपल्या सारख्या पत्रकारांंनी केले आहे. समाजातील विविध प्रश्न मांडण्याचे काम पत्रकार करीत असतात. तळागाळातील प्रश्न ज्यात आर्थिक, सामाजिक, विज्ञानाचे अशा सर्वच प्रश्नांवर जनजागृती आणि उलगडा करण्याचे काम पत्रकार करत असतात दर्पण दिनानिमित्त पत्रकारांचा सत्कार सोहळा पाहण्यास मी येथे उपस्थित झालो असल्याचेही अॅड. भास्कर मगरे यावेळी म्हणाले.
विजयकुमार सकलेचा म्हणाले की, मागील आठवड्यात प्रेस कॉन्सील ऑफ महाराष्ट्र जालना जिल्ह्याच्या वतीने पत्रकारांचा सन्मानाचा मोठा कार्यक्रम सहा जानेवारी रोजी आयोजित करण्यात आला होता. मात्र, या कार्यक्रमात जाहिरात प्रतिनिधींचा सत्कार झाला नसल्याबाबत खेद व्यक्त केला. तसेच पुन्हा पीसीएमचे जिल्हाध्यक्ष दीपक शेळके व मराठा महासंघाचे अरविंद देशमुख यांनी जाहीरात प्रतिनिधींच्या सत्कारांचा योग घडवून आणला त्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले. वृत्तपत्रात वितरण, संपादकीय विभाग, जाहीरातदार, बातमीदार आणि डीटीपी विभाग हे पाच प्रमुख घटक आहेत थोडक्यात लोकशाहीतील चौथा खांब असलेल्या वृत्तपत्रांसाठी हे पाच खांब महत्त्वाचे असल्याचे सांगून उपस्थित पत्रकारांना विजयकुमार सकलेचा यांनी शुभेच्छा दिल्या.
प्रसंगी जाहीरात व्यवस्थापक-प्रतिनिधींचा प्रिंट मिडीया डेव्हलपमेंट पुरस्कार 2025 ने दैनिक लोकमतचे नरेश कोरडे यांना सन्मानित करण्यात आले. याच बरोबरच दैनिक आनंद नगरीचे गौरव संत, दै. सकाळचे संदीप खरात, गोपाल बुट्टे, दै. दिव्य मराठीचे विठ्ठल देंडगे यांना सन्मानित करण्यात आले. मंठा येथील अतुल खरात यांना युवा पत्रकार पुरस्काराने यावेळी सन्मानित करण्यात आले. उपस्थित सर्व पत्रकारांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मराठा महासंघाचे अरविंद देशमुख यांनी केले. अशोक पडुळ यांनी आभार मानले. तर अच्युत मोरे यांनी सुत्रसंचलन केले.