जिल्हाधिकारी यांनी केली वेश्वी येथिल शासकीय रोपवाटिकेची पाहणी…
रायगड प्रतिनिधी- अलिबाग तालुक्यातील शासकीय रोपवाटिका वेश्वी येथे यावर्षी एक लाख बांबूची रोपे निर्मितीचे इष्टांक देण्यात आलेला आहे. त्याची तयारी सुरू झालेली असून बांबूचे बियाणे वाफ्यावर टाकण्यात आले आहेत. रोपाची निर्मितीची प्रक्रिया सुरू झालेली आहे. जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी आज भेट देऊन पाहणी केली.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत रोपवाटिका निर्मिती आणि विशेषतः बांबू रोपाची निर्मिती करण्याचा नाविन्यपूर्ण प्रयोग शासकीय रोपवाटिका वेश्वी येथे सुरु आहे. या उपक्रमाचे जिल्हाधिकारी श्री जावळे यांनी कौतुक केले. या माध्यमातून शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी बांबूचे महत्त्व विशद करत भविष्यामध्ये मोठ्या प्रमाणावर बांबू लागवडीची पूर्वतयारी चांगल्या प्रकारे सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
जिल्ह्यातील बचत गट, महिला बचत गट तसेच शेतकऱ्यांना बांबू लागवडीसाठी प्रोत्साहित करण्यासाठीचा उपक्रम अत्यंत महत्त्वपूर्ण असल्याचे जिल्हाधिकारी यांनी यावेळी सांगितले. भविष्यातील बांबूची मागणी पूर्ण करण्यासाठी शासकीय रोपवाटिका तसेच स्वयं सहायता गट यांनी पुढाकार घेऊन बांबू लागवडी प्रोत्साहन देण्याचा मानस व्यक्त केला.जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर सामूहिक वनहक्क पट्टे (सीएफआर) दिलेले असून सदर रोपं निर्माण झाल्यावर ही रोपं प्रामुख्याने जिल्ह्यातील सामूहिक वनहक्क जमिनीवर (CFR) लागवड करण्याचे नियोजन असल्याबाबत जिल्हाधिकारी यांनी यावेळी अधोरेखित केले. गडचिरोली जिल्ह्यातील मेंढालेखा हे गाव सीएफआर च्या अशा शाश्वत व्यवस्थापनातून समृद्ध झाल्याने या गावाचे उदाहरण जिल्हाधिकारी जावळे यांनी सांगितले.
रायगड जिल्ह्यात वनविभाग रोहा यांच्या ५ रोपवाटिका, वनविभाग अलिबाग यांच्या १५ रोपवाटिका, सामाजिक वनीकरण विभागाच्या १४ रोपवाटिका आणि कृषी विभागाच्या ७ रोपवाटिका अशा एकूण ४१ रोपवाटिकांमध्ये ३० लक्ष बांबू रोपं लागवडीचे नियोजन आहे.
यावेळी जिल्हा परिषद चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.भरत बास्टेवाड, कृषी उपसंचालक श्री थिगळे, उपविभागीय कृषी अधिकारी श्री वानखेडे, तालुका कृषी अधिकारी श्री भगत, रोपवाटिकेचे कृषि अधिकारी श्री गावडे, कृषि सेवक श्री.तिडके व इतर अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.