इकरा अपहरण प्रकरणाच्या उच्चस्तरीय तपासाची खा. कल्याण काळे यांची मागणी,शिष्टमंडळाने दिले जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
==========
जालना/प्रतिनिधी : अंबड शहरातील फैसलाबाद कॉलनी येथील ३ वर्षीय इकरा अमजद मनियार मुलीच्या अपहरण प्रकरणाचा १२ जानेवारी २०२५ पासून शोध सुरू आहे. मात्र, ४६ दिवस उलटूनही तपासाला वेग आलेला नाही. त्यामुळे मुलीच्या कुटुंबीयांवर मोठा मानसिक ताण येत असून, पोलीस प्रशासनाच्या कार्यक्षमतेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या घटनेच्या उच्चस्तरीय तपासाची मागणी खा. डॉ. कल्याण काळे यांनी केली असून, त्यांच्यामार्फत काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले
खा. डॉ. काळे यांच्यावतीने अंबड तालुका काँग्रेसचे अध्यक्ष कल्याणराव तार्डे, अंबड शहराध्यक्ष जाकीरभाई डावरगावकर, माजी नगरसेवक शेख शकील लालमिया, हाजी अब्दुल हमीद, माजी नगरसेवक सय्यद अझहर, युवक काँग्रेस जालना विधानसभा अध्यक्ष शेख वसीम, काँग्रेसचे जिल्हा सचिव लक्ष्मणराव बोंबले आणि रसूलभाई यांनी आज गुरुवार दि. 27 फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले. त्यात म्हटले आहे की, अंबडमध्ये घडलेल्या या धक्कादायक घटनेला ४६ दिवस उलटूनही कोणतेही ठोस निष्कर्ष समोर आलेले नाहीत. अपहरणाच्या सुरुवातीच्या २४ तासांतच प्रभावी तपास होणे अपेक्षित होते, मात्र तसे झाले नाही. प्रशासनाच्या दिरंगाईमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला असून, शहरात असुरक्षिततेचे वातावरण आहे.या प्रकरणाचा तपास तातडीने जलदगतीने करण्यात यावा तसेच दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी खासदार डॉ. कल्याण काळे यांनी केली आहे. जर प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले, तर तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे. कुटुंबाला न्याय मिळेपर्यंत काँग्रेस पक्ष तडजोड करणार नाही व या प्रकरणाचा तपास जलदगतीने व्हावा यासाठी लढा सुरूच राहील, असा निर्धार काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. अंबडमध्ये निर्माण झालेल्या असुरक्षिततेच्या वातावरणामुळे नागरिकांमध्ये भीती आहे. पोलीस प्रशासनाने तत्काळ उच्चस्तरीय तपास करून सत्य समोर आणावे, जेणेकरून नागरिकांचा विश्वास प्रशासनावर पुन्हा बसू शकेल, असे खा. डॉ. कल्याण यांनी निवेदनात म्हटले आहे.