नागपुरात दंगल करणाऱ्या दंगलखोरांची प्रॉपर्टी विकून नुकसान भरपाई वसूल करणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…
राज्य प्रतिनिधी- राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये नागपुरात झालेल्या दंगली विषयी माहिती देताना म्हणाले की नागपूरच्या महल, हंसापुरी आणि भालदारपुरा भागात दंगल उसळली होती. दंगल घडवणाऱ्या लोकांना अटक करण्यात आले असून त्यांना नुकसान भरुन द्यावे लागेल, 104 लोकांना या दंगली प्रकरणात अटक करण्यात आली आहे पुढील कारवाई सुरू असणार आहे अशी माहिती फडणवीस यांनी यावेळी पत्रकार परिषदेत दिली
नागपूरमध्ये वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी म्हटले की, पोलिसांनी चार-पाच तासांत दंगल नियंत्रणात आणली. त्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्यांचा वापर करण्यात आला. या सगळ्यात अनेक पोलीस कर्मचारी जखमी झाले. यानंतर पोलिसांनी दंगलीचे सीसीटीव्ही फुटेज, लोकांना मोबाईलवर केलेले चित्रीकरण याआधारे दंगेखोरांची ओळख पटवून त्यांच्यावर कारवाई केली आहे. आतापर्यंत 104 दंगलखोरांची ओळख पटली आहे. त्यापैकी 92 जणांना अटक केली आहे. तर 12 जण अल्पवयीन असल्याने त्यांच्यावरही विधिसंघर्षित कायद्यानुसार कारवाई सुरु आहे. आणखी काही लोकांना अटक करण्याचा पोलिसांचा मानस आहे. जो व्यक्ती दंगल करताना दिसतोय किंवा दंगलखोरांना मदत करताना दिसतोय, अशा प्रत्येकावर कारवाई करण्याच्या मानसिकतेत पोलीस आहेत.
आणि याच प्रकारे मोठ्याप्रमाणावर सोशल मिडिया ट्रॅकिंग करुन ज्या लोकांना दंगल भडकावण्यासाठी चिथावणी दिली, त्यांनाही सहआरोपी केले जाणार आहे. आतापर्यंत एकूण 68 पोस्ट डिलिट करुन कारवाई करण्यात आली आहे. ज्या लोकांनी भडकावणारं पॉडकास्ट केलं, अफवा पसरवल्या, अशा सर्व लोकांवर कारवाई होईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
या दरम्यान-ज्या लोकांचं नुकसान झाले आहे, गाड्या फुटल्या आहेत, त्यांना येत्या तीन-चार दिवसांत नुकसान भरपाई मिळेल. नागपूरमधील संचारबंदीमुळे जे काही निर्बंध आहेत, त्यामुळे जनजीवन आणि व्यापारावर परिणाम झाला आहे. आता वातावरण शांत असल्याने यामध्ये शिथिलता आणण्याचा प्रयत्न आहे. मात्र, पोलीस पूर्णपणे सजग राहतील. दंगलीत झालेले नुकसानीचे पैसे दंगेखोरांकडून वसूल केले जातील, असे यावेळी त्यांनी सांगितले