
*प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियानाची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी- प्रकल्प अधिकारी हर्षिता भटनागर
रायगड ( प्रतिनिधी :-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 नोव्हेंबर 2023 झारखंडच्या खुंटी गावातून जनजाती गौरव दिनी प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियानाची सुरुवात केली आहॆ. या अभियानाची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करावी, असे निर्देश प्रकल्प अधिकारी आदिवासी व्यवहार मंत्रालय, भारत सरकार हर्षिता भटनागर यांन आज येथे दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात पंतप्रधान जनजाती आदिवासी न्याय महाअभियानाच्या आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के, प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प पेण तेजस्विनी गलांडे यांसह विविध शासकीय विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
यावेळी प्रकल्प अधिकारी हर्षिता भटनागर म्हणाल्या की, आदिम आदिवासी गटांची सामाजिक, आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी या अभियानाचे 3 वर्षाचे नियोजन आहे. याकरिता 11 प्राधान्य क्षेत्रे निश्चित करण्यात आली आहेत. आणि संबंधित 9 मंत्रालये प्रशासनाच्या सर्वोच्च स्तरापासून तळागाळापर्यंत एकीकृत केली आहे. राष्ट्रीय स्तरावर या मिशनासाठी रु.24000 कोटींची तरतूद आहे. यावेळी त्यांनी सुरु प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियांतर्गत जिल्ह्यात सुरु असलेल्या काजकाजाचा आढावा उपस्थित संबंधित अधिकाऱ्यांकडून जाणून घेतला.
यावेळी प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प पेण तेजस्विनी गलांडे यांनी संगणकीय सादरीकरणाद्वारे प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियाची माहिती उपस्थितांना दिली.
०००००



