सांगली आंबा महोत्सवास प्रचंड प्रतिसाद,३३.६० लाखाची उलाढाल..
सांगली, प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळ, कोल्हापूर व कृषि उत्पन्न बाजार समिती, सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सांगली आंबा महोत्सव 2025 ला नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळून ३३ लाख ६० हजार रुपयांची उलाढाल झाली. ही माहिती कोल्हापूर विभागाचे उपसरव्यवस्थापक डॉ. सुभाष घुले यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.
प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे, राज्याचे पणन मंत्री जयकुमार रावल व कृषि पणन मंडळाचे कार्यकारी संचालक संजय कदम व सरव्यवस्थापक विनायक कोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आलेल्या या आंबा महोत्सवात सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सांगली, सोलापूर जिल्ह्यातील 18 आंबा उत्पादक शेतकऱ्यांनी सहभाग घेतला. या आंबा महोत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे सांगली जिल्ह्यात उत्पादित झालेल्या आंब्याच्या विविध 36 जातींचे प्रदर्शन मांडण्यात आलेले होते. त्यामुळे ग्राहकांना आंब्याच्या विविध जाती पाहायला मिळाल्या. तसेच रत्नागिरी जिल्ह्यातील हापूस आंबा उत्पादकांनी यावर्षी क्यू आर कोड चा वापर केल्याने ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला. तसेच आपणास रत्नागिरीचा प्युअर हापूस आंबा उपलब्ध झाल्याचा आनंद मिळाला. या पाच दिवस चाललेल्या आंबा महोत्सवामध्ये एकूण रक्कम रुपये 33.60 लाखाचे उलाढाल झाल्याचे पत्रकात म्हटले आहे.
सहभागी झालेल्या सर्वच आंबा उत्पादकांना आयोजकांकडून प्रशस्तीपत्र देण्यात आले. यावेळी माळशिरस तालुक्यातील आंबा उत्पादक डॉ. केशव सरगर यांनी कृषि पणन मंडळाचे आभार मानले व पणन मंडळामुळे आम्ही थेट आंब्याची विक्री करायला शिकलो असे नमूद केले. दापोली येथील आंबा उत्पादक सलमान मुकादम यांनी यावर्षी सांगलीकरांनी प्रचंड प्रतिसाद दिल्याचे सांगितले. रत्नागिरी येथील आंबा उत्पादक सौ. जोशी यांनी सांगलीमध्ये रत्नागिरी हापूस आंब्याचे उत्तम विक्री झाल्याचे नमूद केले. पणनचे अधिकारी ओंकार माने यांनी उपस्थित आंबा उत्पादकांचे आभार मानले.