
आरोग्य, शिक्षण, रोजगारासह सर्वसामान्यांचे घराचे स्वप्न साकार करण्यास प्राधान्य – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
‘स्वप्ननिकेतन’ सदनिकांचे लाभार्थ्यांना हस्तांतरण; विविध विकास कामांचेही लोकार्पण
नागपूर, प्रतिनिधी: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी प्रत्येक भारतीयाचे घराचे स्वप्न पूर्ण करायचा संकल्प केला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून गेल्या काही काळामध्ये जवळपास साडेतीन कोटी घरे तयार झाली आणि आता नवीन अडीच कोटी घरांचे बांधकाम सुरू झालेले आहे. महाराष्ट्रामध्येही ३० लाख घरे उपलब्ध होणार आहेत. आरोग्य, शिक्षण, रोजगारासह सर्वसामान्यांचे घराचे स्वप्न साकार करण्यास प्राधान्य असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.
नागपूर महानगरपालिकेतर्फे प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत मौजा वांजरा येथील जागेवर बांधण्यात आलेले 480 सदनिकांचे हस्तांतरण व विविध विकास कामांचे लोकार्पण आज करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आणि महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे व वित्त राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांच्या उपस्थितीत प्रातिनिधिक स्वरूपात लाभार्थ्यांना सदनिकांच्या किल्ली सुपूर्द करण्यात आल्या.नगर विकास विभागाचे प्रधान सचिव डॉ. के. एच. गोविंदराज, मनपाचे आयुक्त तथा प्रशासक डॉ.अभिजीत चौधरी, अतिरिक्त आयुक्त वसुमना पंत, अतिरिक्त आयुक्त वैष्णवी बी., नगर विकास विभागाच्या विद्या हम्पय्या, अतिरिक्त आयुक्त अजय चारठाणकर, मनपाचे मुख्य अभियंता मनोज तालेवार, मनपाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर, बांधकाम व्यावसायिक गौरव अग्रवाल, पीएमसीचे दिनेश वराडे यांच्यासह मनपाचे अधिकारी कर्मचारी व नागरिक यावेळी उपस्थित होते.
मार्गदर्शन करताना मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी सर्वप्रथम लाभार्थ्यांचे अभिनंदन केले. प्रधानमंत्री आवास योजना शहरी अंतर्गत मनपाने अतिशय उत्तम सदनिका तयार केल्याची भावना व्यक्त करीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शहरातील सहाही विधानसभा क्षेत्र निहाय पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत किमान एक हजार घरांच्या इमारती उभारण्यात याव्या. जेणेकरून नागरिकांना राहण्याची उत्तम व्यवस्था होईल. झोपडपट्टीत राहणाऱ्या नागरिकांना देखील मालकी हक्काचे पट्टे दिले जात असून, पुढील काळात सर्वाना पक्के घरे मिळतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.नागपूर हे हरित शहरांच्या यादीत असून येथील विकासासह पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी पर्यावरणपूरक अशा ई बसेस देखील नागरिकांच्या सेवेत उपलब्ध करून दिल्या आहेत. नागरिकांनी स्वतःच्या वाहनांचा कमीत कमी उपयोग करून सार्वजनिक वाहतूक सेवेचा लाभ घ्यावा असेही श्री. फडणवीस यावेळी म्हणाले.
महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि आशिष जयस्वाल यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी स्वप्ननिकेतन या सदनिकेबद्दल माहिती देत राज्य शासनाकडून निधी उपलब्धतेबद्दल आभार मानले.



