मनोज जरांगे पाटील यांना-मुंबई सीएसटीतील आझाद मैदान रिकामं करण्याचा आदेश; आंदोलनाला नवा ट्विस्ट…
मुंबई प्रतिनिधी: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील हे मागील पाच दिवसांपासून मुंबईतील आझाद मैदानात आमरण उपोषणाला बसले आहेत. “मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्यावे” या प्रमुख मागणीवर ते ठाम आहेत. सुरुवातीला पोलिसांनी काही अटी-शर्तींसह या आंदोलनाला परवानगी दिली होती. मात्र, नियमांचे उल्लंघन होत असल्याचे सांगून सोमवारी मुंबई उच्च न्यायालयाने आंदोलकांनी व्यापलेले रस्ते त्वरित रिकामे करण्याचे आदेश दिले.
याच पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी मंगळवारी मनोज जरांगे पाटील आणि त्यांच्या कोअर कमिटीला नोटीस बजावली आहे. या नोटिशीत आझाद मैदान व परिसरातील रस्ते मोकळे करून दुपारी पर्यंत जागा स्वच्छ करण्याचे निर्देश दिले आहेत. आदेश न पाळल्यास कायदेशीर कारवाईचा इशारा देखील दिला गेला आहे.
जरांगे पाटलांचा मात्र ठाम पवित्रा आहे – “मागण्या मान्य झाल्याशिवाय मुंबई सोडणार नाही.” त्यामुळे पोलिसांच्या नोटिशीला ते कसा प्रतिसाद देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार तसेच काही मंत्र्यांची बैठक पार पडली असून आज सरकारकडून जरांगे पाटलांना एक अधिकृत प्रस्ताव पाठवण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. आंदोलनाचे स्वरूप आणि सरकारचा पुढील निर्णय यावर आजची सुनावणी निर्णायक ठरणार आहे.
मुंबई उच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे की आंदोलन शांततेत, नियम व अटींचे पालन करून व्हावे, अन्यथा नागरिकांचे जनजीवन विस्कळीत होईल. दुपारी १ वाजता या प्रकरणाची पुढील सुनावणी होणार असून संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष आता न्यायालयीन आदेश आणि जरांगे यांच्या भूमिकेकडे लागले आहे.