मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाविषयी जिल्हास्तरीय प्रशिक्षण कार्यशाळा-17 सप्टेंबर ते 31 डिसेंबरपर्यंत अभियान राबविण्यात येणार
बुलढाणा,द प्रतिनिधी: ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने शासकीय योजनांच्या प्रभावी व जलदगतीने अंमलबजावणीसाठी राबविण्यात येणाऱ्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाविषयी जिल्हास्तरीय प्रशिक्षण कार्यशाळेचे सहकार विद्या मंदिर, बुलढाणा येथे नुकतेच आयोजन करण्यात आले होते.ग्रामविकास विभाग व जिल्हा परिषद, बुलढाणा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यशाळेस प्रमुख अतिथी म्हणून आमदार संजय गायकवाड, तर अध्यक्षस्थानी मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाब खरात हे होते.
“मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान” या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी कार्यशाळेमध्ये सुशासनयुक्त पंचायत सक्षम पंचायत, जलसमृद्ध स्वच्छ व हरित गाव, मनरेगा व इतर योजनांचे अभिसरण, गाव पातळीवरील संस्था सक्षमीकरण, उपजीविका विकास सामाजिक न्याय, लोकसहभाग व श्रमदान माध्यमातून लोकचळवळ निर्माण करणे, नाविन्यपूर्ण उपक्रम याविषयी मार्गदर्शन करण्यात आले.
या कार्यशाळेसाठी तज्ञ मार्गदर्शक म्हणून अनंतकुमार नेमाने यांनी मार्गदर्शन केले. या कार्यशाळेला जिल्हा परिषदचे विविध विभाग प्रमुख, सर्व पंचायत समितीचे गटविकास अधिकारी, सर्व ग्रामपंचायत सरपंच, सर्व विस्तार अधिकारी व सर्व ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाच्या नियोजनासाठी उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा) संजय इंगळे, सहाय्यक गटविकास अधिकारी सुरेश तायडे, विस्तार अधिकारी व्ही बी राऊत, ग्रामपंचायत अधिकारी गणेश जायभाये, सुमित भोपळे, जिल्हा व्यवस्थापक (आरजीएसए) कौतिक पाडळे व ग्रामपंचायत विभागातील इतर कर्मचारी यांनी नियोजनासाठी विशेष परिश्रम घेतले. या कार्यशाळेचे सूत्रसंचालन विस्तार अधिकारी चंद्रशेखर जोशी यांनी केले.
15 लाख ते पाच कोटींपर्यंतचे बक्षिस,मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान हे दि. 17 सप्टेंबर ते दि. 31 डिसेंबर, 2025 या कालावधीत राबविण्यात येणार असून या अभियानांतर्गत ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषद यांनी केलेल्या कामगिरीचे मूल्यमापनही केले जाणार आहे. या अभियानात सहभाग घेणाऱ्या ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषदांना बक्षिस दिले जाणार आहे.