
भारतातील प्रवास सेवा अधिक आधुनिक आणि सुरक्षित करण्यासाठी परराष्ट्र मंत्रालयाने ई-पासपोर्टची सुविधा सुरू
राज्य प्रतिनिधी-भारतातील प्रवास सेवा अधिक आधुनिक आणि सुरक्षित करण्यासाठी परराष्ट्र मंत्रालयाने ई-पासपोर्टची सुविधा सुरू केली आहे. एप्रिल २०२४ मध्ये पायलट प्रकल्प म्हणून सुरुवात झाल्यानंतर जून २०२५ पासून हा उपक्रम देशभर राबविण्यात आला.
ई-पासपोर्ट दिसायला पारंपरिक पासपोर्टसारखाच असतो, परंतु त्यात अतिरिक्त तांत्रिक सुविधा देण्यात आल्या आहेत. त्याच्या कव्हरमध्ये रेडिओ फ्रीक्वेन्सी ओळख चिप बसवण्यात आले आहेत. या चिपमध्ये पासपोर्टधारकाची संपूर्ण माहिती सुरक्षितपणे साठवलेली असते.पासपोर्टमुळे विमानतळांवर प्रवाशांची तपासणी जलदगतीने आणि अचूकरीत्या होईल. सुरक्षेत मोठी वाढ होऊन रांगा कमी होतील. प्रवाशांचा वेळ वाचेल आणि त्यांच्या प्रवासाचा अनुभव अधिक सुखद बनेल. तसेच, ई-पासपोर्टचा वापर केल्याने आंतरराष्ट्रीय पातळीवर भारतीय प्रवाशांविषयी विश्वासार्हता वाढेल. परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले की, ई-पासपोर्टमुळे भारताची प्रतिमा जागतिक स्तरावर अधिक भक्कम होईल. अनेक देशांमध्ये अशा प्रकारची पासपोर्ट प्रणाली आधीपासून कार्यरत आहे.
डिजिटल भारत मोहिमेच्या अनुषंगाने हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. नागरिकांच्या सेवेत तंत्रज्ञानाचा उपयोग करून सुरक्षितता, पारदर्शकता आणि सुलभता वाढविणे हा यामागचा उद्देश आहे. येत्या काळात सर्व नवीन पासपोर्ट ई-पासपोर्ट स्वरूपात जारी केले जातील, अशी माहितीही मंत्रालयाने दिली आहे.



