जिल्ह्यात मुसळधार, ६८ मंडळांमध्ये अतिवृष्टी,३५४ नागरिकांची पुराच्या वेढ्यातून सुटका; प्रशासन सतर्क मुख्यमंत्री फडणवीस जिल्हा प्रशासनाच्या संपर्कात..
छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी- जिल्ह्यात गेल्या २४ तासांत मुसळधार पाऊस झाला. तब्बल ६८ मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली असून त्यामुळे सर्वत्र नद्या, नाल्यांना पुर आला आहे. पुरस्थिती हाताळण्यासाठी जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर असून मदत व बचाव पथकांनी आतापर्यंत पुरात वेढल्या गेलेल्या ३५४ नागरिकांची सुखरुप सुटका केली आहे. जायकवाडी सह जिल्ह्यातील अन्य प्रकल्पांमधून विसर्ग सुरु आहे. नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वतः जिल्हा प्रशासनाच्या संपर्कात असून प्रशासन सतर्क असल्याचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी सांगितले.
जिल्ह्याचे वार्षिक सरासरी पर्जन्यमान ५८१.२ मि.मी इतके असून आज अखेर ८१८.५ मि.मी इतके पर्जन्यमान झाल्याची नोंद झाली आहे. गेल्या २४ तासांत ११०.३ मि.मी इतके पर्जन्यमान नोंदविण्यात आले. एकूण वार्षिक १४०.७ टक्के पर्जन्यमान झाले आहे. जिल्ह्यात गेल्या २४ तासांत ८४ पैकी ६८ मंडळांमध्ये अतिवृष्टी नोंदविण्यात आली.
६८ मंडळांमध्ये अतिवृष्टी,जिल्ह्यातील एकूण ६८ मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली. अतिवृष्टी झालेली तालुकानिहाय मंडळे याप्रमाणे
1) छत्रपती संभाजीनगर तालुका• छत्रपती संभाजीनगर – 87.8 मि.मी.• उस्मानपुरा – 97.5 मि.मी.• भावसिंगपूरा – 99.5 मि.मी.• कांचनवाडी – 142.5 मि.मी.• चिकलठाणा – 66.0 मि.मी.• चौका – 100.0 मि.मी.• पंढरपूर – 82.3 मि.मी.• पिसादेवी – 66.5 मि.मी.• वरूड काझी – 66.5 मि.मी.2) पैठण तालुका• आडूळ – 87.0 मि.मी.• पैठण – 69.5 मि.मी.• पाचोड – 69.8 मि.मी.3) गंगापूर तालुका• गंगापूर – 148.5 मि.मी.• मांजरी – 151.0 मि.मी.• भेंडाळा – 156.3 मि.मी.• शेंदुरवाडा – 99.5 मि.मी.• तुर्काबाद – 165.0 मि.मी.• वाळूज – 126.8 मि.मी.• हर्सूल – 196.3 मि.मी.• डोनगाव – 193.3 मि.मी.• सिद्धनाथ – 150.8 मि.मी.• आसेगाव – 118.0 मि.मी.• गाजगाव – 150.8 मि.मी.• जामगाव – 148.5 मि.मी.4) वैजापूर तालुका• वैजापूर – 174.8 मि.मी.• खंडाळा – 172.5 मि.मी.• शिऊर – 189.3 मि.मी.• बोरसर – 189.3 मि.मी.• लोणी – 172.0 मि.मी.• गारज – 151.0 मि.मी.• लासूरगाव – 127.8 मि.मी.• महालगाव – 173.3 मि.मी.• नागमथान – 173.3 मि.मी.• लाडगाव – 173.3 मि.मी.• गायगाव – 164.8 मि.मी.• जाणेफळ – 175.0 मि.मी.• भाटतारा – 171.0 मि.मी.6) कन्नड तालुका• कन्नड – 135.3 मि.मी.• चापानेर – 135.3 मि.मी.• देवगाव – 166.0 मि.मी.• चिकलठाणा – 117.0 मि.मी.• पिशोर – 126.5 मि.मी.• नाचणवेल – 125.3 मि.मी.• चिंचोली – 120.8 मि.मी.• करंजखेड – 139.5 मि.मी.• नागद – 85.5 मि.मी.7) खुलताबाद तालुका• वेळू – 180.8 मि.मी.• सुलतानपूर – 110.0 मि.मी.• बाजार – 105.0 मि.मी.8) सिल्लोड तालुका• सिल्लोड – 159.8 मि.मी.• निल्लोड – 122.3 मि.मी.• भराडी – 90.0 मि.मी.• गोळेगाव – 71.0 मि.मी.• अजिंठा – 71.5 मि.मी.• आमठाण – 78.5 मि.मी.• बोरगाव – 78.5 मि.मी.• आंबई – 78.5 मि.मी.• पालोद– 74.3 मि.मी.• शिवना – 71.5 मि.मी.• उडणगाव – 71.0 मि.मी.9) सोयगाव तालुका• सोयगाव – 68.5 मि.मी.• बनोटी – 103.8 मि.मी.• जरांडी– 66.0 मि.मी.10) फुलंब्री तालुका• फुलंब्री – 126.3 मि.मी.• आळंद – 113.5 मि.मी.• पीरबावडा – 109.5 मि.मी.• वडोदबाजार – 121.0 मि.मी.• बाबरान – 131.0 मि.मी.मुख्यमंत्री फडणवीस जिल्हाप्रशासनाच्या संपर्कात,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जिल्ह्यातील पुरस्थितीबाबत सतत जिल्हा प्रशासनाच्या संपर्कात असून त्यांनी जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्याकडून दुरध्वनीवरुन मदत व बचाव कार्याची माहिती घेतली. मुख्यमंत्री कार्यालयास जिल्हाधिकारी कार्यालयाकडून दर दोन तासाला अहवाल पाठविला जात आहे. जिल्ह्यातील मदत व बचाव कार्याबद्दल मुख्यमंत्री फडणवीस यांनी समाधान व्यक्त केले,असे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी सांगितलेपालकमंत्री स्वतः मदत व बचाव कार्यात,जिल्ह्यातील पुरस्थितीबाबत राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा पालकमंत्री संजय शिरसाट हे सतत जिल्हा प्रशासनाच्या संपर्कात असून मदत व बचाव कार्यावर लक्ष ठेवून आहेत. पालकमंत्री स्वतः अनेक ठिकाणी प्रत्यक्ष उपस्थित राहून मदत व बचाव कार्यावर लक्ष देऊन होते. नारायणपुर येथे आ. रमेश बोरनारे हे त्यांच्या समवेत होते.
प्रशासन २४ तास अलर्ट,अतिवृष्टीची शक्यता लक्षात घेता जिल्हा प्रशासन जिल्हा ते गाव पातळीपर्यंत २४ तास अलर्ट आहे. सर्वच अधिकारी, कर्मचारी यांना आपापल्या मुख्यालयी थांबण्याचे आदेश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिले आहेत. प्रत्येक आपत्तीच्या ठिकाणी वेळीच आगाऊ सुचना देऊन नागरिकांना सतर्क करण्यात येत आहे. प्रतिसाद कालावधी शून्यावर आणण्याचे प्रशासनाचे उद्दिष्ट असल्याचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी सांगितले. जिवितहानी रोखणे हा पहिला उद्देश आहे,असेही त्यांनी सांगितले. नागरिकांनी प्रशासनाला सहयोग द्यावा,असे आवाहनही त्यांनी केले आहे३५४ नागरिकांची सुखरुप सुटका,दि.२७ रोजी मदन झब्बू राठोड (वय ५५, रा. गराडा, ता. कन्नड) हे ब्राम्हणी नदीत वाहून गेले असून शोध मोहीम सुरू आहे, अद्याप त्यांचा शोध लागलेला नाही. याशिवाय सोयगाव तालुक्यातील बोरमाळ तांड्यावरील ६ शेळ्या पुराच्या पाण्यात वाहून गेल्या आहेत.
खुलताबाद तालुक्यातील बाजारसावंगी येथे ६ काटशिवरी फाटा येथे ३ भिवगाव येथे २७ व बाबुळगाव येथे १७ नागरिक पुरात अडकले होते. या सर्वांना सुखरुप बाहेर काढण्यात आले आहे. वैजापूर तालुक्यात भिवगाव येथे २७म बाहुळगाव येथे १५, नारायणपूर येथे १८ जणांना, हडस पिंपळगाव येथे १ जणास सुखरुप बाहेर काढण्यात आले. वैजापूर नगरपरिषद क्षेत्रात २५० नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. कन्नड तालुक्यात अंतापूर येथे ४, देवगाव रंगारी येथे ६ नागरिकांना पुरातून सुखरुप बाहेर काढण्यात आले. गंगापूर तालुक्यात अमळनेर येथे २२ जणांना सुखरुप बाहेर काढण्यात आले. तसेच काटे पिंपळगाव येथे ४ तर पेंडापूर येथे ५ , नरसापूर येथे १ व्यक्ति अडकले आहेत. त्यांना बाहेर काढण्याचे काम सुरु होते. मालूंजा येथील दोघांना सुखरुप बाहेर काढण्यात आले.जिल्ह्यात सायं.४ वा. पर्यंत एकूण १५ गावांमध्ये पुरात अडकलेल्या ३७९ पैकी ३५४ नागरिकांची सुखरुप सुटका करुन त्यांना सुरक्षित ठिकाणि हलविण्यात आले आहे.
जायकवाडी धरणातून २ लाख २६ हजार ३६८ क्युसेक विसर्ग,जायकवाडी धरणाची पाणीसाठा स्थिती ९७.८० टक्के इतकी असून सध्या २ लाख २६ हजार ३६८ क्युसेक विसर्ग करण्यात येत आहे. हा विसर्ग गोदावरी नदीपात्रात सुरू आहे.पैठण तालुक्यात गोदावरी काठावरील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे. पुरबाधितांची व्यवस्था प्रशासनामार्फत शाळांमध्ये करण्यात आली आहे.
पुरस्थितीत नागरिकांनी घ्यावयाची काळजी काय करावे,गावात पूरस्थिती निर्माण झाल्यास अथवा पूराबाबत पूर्व कल्पना मिळाल्यास घरातील उपयुक्त सामान, महत्त्वाची कागदपत्रे, जनावरे सुरक्षित ठिकाणी हलवा.विजेवर चालणाऱ्या उपकरणांचा वीज पुरवठा बंद करावा. गावात अचानक पूरस्थिती निर्माण झाल्यास तात्काळ प्रशासनास कळवावे. गावात, घरात जंतुनाशक असतील तर ते पाण्यात विरघळणार नाहीत याची दक्षता घ्या. पूरस्थितीत उंच ठिकाणी जावे तसेच जातेवेळी सोबत रेडिओ, टॉर्च, सुके खाण्याचे पदार्थ, पिण्याचे पाणी सोबत ठेवावे. शक्य असल्यास घरातील वाहने उंच ठिकाणी हलवा.
घर सोडून जाताना दारे, खिडक्या सर्व घट्ट बंद करून जा. कुटुंबातील सर्व व्यक्तींकडे ओळखपत्र न भिजता राहील याची काळजी घ्या.पूरामध्ये अडचणीत सापडला असाल तर आजूबाजूच्या साधनांचा वापर करा. (उदा. पाण्यावर तरंगणारे मोठे लाकूड, प्लास्टिकचे ड्रम याचा वापर करा), कोणी व्यक्ती वाहत जात असेल तर दोरीच्या सहाय्याने त्याला वाचवण्याचा प्रयत्न करा.
पूरस्थितीत घाबरून जाऊ नका, सूचनांचे पालन करा. मदत आवश्यक असल्यास तात्काळ स्थानिक तहसील कार्यालयास किंवा जिल्हा आपत्ती निवारण कक्ष येथे ०२४०-२३३१०७७ या क्रमांकावर अथवा १०७७ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा. आपले पशुधन व अन्य पाळीव प्राणी यांना बांधले असेल तर त्यांना खुले करून सुरक्षितस्थळी हलवावे व स्वतः सुरक्षित स्थळाचा आसरा घ्यावा. कोणत्याही परिस्थितीत प्राण्यांना बांधून ठेवू नये त्यांना खुले सोडावे. प्राणी खुले सोडल्याने ते स्वतःचा बचाव स्वतः करू शकतील. सोबत रेडीओ, बॅटरी, मोबाईल इ. संपर्काची साधने ठेवण्याचा प्रयत्न करावा. हे साहित्य भिजणार नाही व सुरक्षित राहील याची योग्य खबरदारी घ्यावी.
काय करू नये,पूर असलेल्या भागात, नंदीच्या पूलावर विनाकारण भटकू नका. पूराच्या पाण्यात चुकूनही जावू नका.तसेच पूर ओसरल्यानंतर प्रशासनानाने परवानगी दिल्याशिवाय पूलावरुन गाडी घालण्याचा, अथवा पूल ओलांडण्याचा प्रयत्न करू नका. दूषित / उघड्यावरील अन्न व पाणी टाळा. (शक्यतो उकळलेले पाणी व सुरक्षित अन्न सेवन करा.)सुरक्षित ठिकाणी रहा व विद्युत् तारांना स्पर्श करू नका. पोहता येत असेल तरच बुडणाऱ्या व्यक्तींना वाचवा परंतू अपरीचीत व खोल पाण्यात जाऊ नका. जलसाठ्याजवळ / नदीजवळ जाऊ नये. आपल्या मुलांना जलसाठ्यावर, नदीवर पोहण्यासाठी पाठवू नये. मच्छिमार व अन्य व्यक्तींनी पाण्यामध्ये जाऊ नये, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे सचिव जनार्दन विधाते यांनी केले आहे.