– संचालक शतानिक भागवत कुंडल वन प्रबोधनीत वन्यजीव सप्ताहाची सुरुवात उत्साहात
सांगली, प्रतिनिधी : सृष्टीतील प्रत्येक जीवाचं अस्तित्व महत्त्वाचं असून, प्रत्येकाने पर्यावरणाचं, वन्यजीवांचं, वृक्ष प्रजातींचं व सृष्टीतील प्रत्येक घटकाचं रक्षण करणे अत्यावश्यक आहे. यासाठी पर्यावरण रक्षणाची सुरूवात स्वत:पासून व्हावी, असे प्रतिपादन कुंडल वन प्रबोधिनीचे संचालक शतानिक भागवत यांनी केले.
वन्यजीव सप्ताहानिमित्त कुंडल वन प्रबोधिनीत आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या प्रसंगी (प्राध्यापक व्यवस्थापन व प्रशासन) हरिश्चंद्र वाघमोडे, सहायक वनसंरक्षक बाळकृष्ण हसबनीस, निवृत्त सहायक वनसंरक्षक रामदास पुजारी, अर्जुन सोनवणे, दत्तात्रय शेटे, सुखदेव खोत, प्रा. के. एन. धुमाळ, प्रबोधिनीत प्रशिक्षण घेत असलेले मध्य प्रदेश राज्यातील 41 वनक्षेत्रपाल प्रशिक्षणार्थी, महाराष्ट्र राज्यातील 72 वनरक्षक प्रशिक्षणार्थी व प्रबोधिनीतील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
संचालक शतानिक भागवत म्हणाले, वन्यजीव संरक्षणाबाबत जनजागृती करण्यासाठी दरवर्षी शासनातर्फे 2 ते 8 ऑक्टोबर या कालावधीत वन्यजीव सप्ताह साजरा केला जातो. आज सर्वत्र प्लास्टिकचा वापर अमर्याद वाढला आहे. प्लास्टिकचा वापर कमीत कमी करणे, प्लास्टिक संकलन करून त्याचं वर्गीकरण करणे, त्याचे पुनर्चक्रीकरण करणे गरजेचे आहे. तसेच, प्लास्टिक पिशवीऐवजी कापडी पिशवीचा वापर, छोट्या अंतरासाठी सायकलचा वापर, वीज बचत, वायु प्रदूषण टाळण्यासाठी फटाकेविरहित दिवाळी व इतर सण साजरे करणे, अशा छोट्या छोट्या कृतींतून आपण पर्यावरणाचे रक्षण करू शकतो, असे ते म्हणाले. या अनुषंगाने त्यांनी सुंदर सादरीकरणही केले.
प्रबोधिनीतील प्राध्यापक (व्यवस्थापन व प्रशासन) हरिश्चंद्र वाघमोडे म्हणाले, प्रत्येक अधिवासाचे व प्रत्येक परिसंस्थेचे रक्षण करणे गरजेचे आहे. त्यासाठी आपण वन अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सर्वतोपरी प्रयत्न करणे आवश्यक आहे. या कामी सर्वांना सहभागी करून घेऊन आपण वनांचे, वन्यजीवांचे रक्षण करणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले.
या प्रसंगी माधवी भारती, आशिष चौहान या वनक्षेत्रपाल प्रशिक्षणार्थींनी तर शैलेश भावर व स्वाती नंदागौळी या वनरक्षक प्रशिक्षणार्थींनीही पर्यावरणविषयक विचार व्यक्त केले. सूत्रसंचालन व आभार रामदास पुजारी यांनी मानले. याप्रसंगी महात्मा गांधी जयंती व लालबहादूर शास्त्री जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यात आले.