जिल्हा उद्योग मित्र समितीच्या माध्यमातून गत आठ महिन्यात उद्योजकांचे अनेक प्रश्न मार्गी- जिल्हाधिकारी अशोक काकडे- तीन क्लस्टरचे काम पूर्ण, पाच क्लस्टरला मंजुरी- उद्योग विभागाच्या समित्यांच्या आढावा बैठकीत दिली माहिती
जिल्हा उद्योग मित्र समितीच्या माध्यमातून गत आठ महिन्यात उद्योजकांचे अनेक प्रश्न मार्गी- जिल्हाधिकारी अशोक काकडे- तीन क्लस्टरचे काम पूर्ण, पाच क्लस्टरला मंजुरी- उद्योग विभागाच्या समित्यांच्या आढावा बैठकीत दिली माहिती
सांगली, प्रतिनिधी) : सांगली जिल्हा उद्योग मित्र समितीच्या माध्यमातून गेल्या आठ महिन्यात उद्योजकांचे अनेक प्रश्न मार्गी लागले आहेत. जिल्ह्यात तीन क्लस्टरचे काम पूर्ण झाले असून, पाच क्लस्टरला मंजुरी मिळाली असल्याची माहिती जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी आज येथे दिली.
उद्योग विभागाच्या समित्यांच्या आढावा बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठक कक्षात आयोजित या बैठकीस महापालिका अतिरीक्त आयुक्त राहुल रोकडे, जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापक विद्या कुलकर्णी, एमआयडीसीच्या प्रादेशिक अधिकारी वसुंधरा बिरजे, महापालिकेचे कार्यकारी अभियंता पृथ्वीराज चव्हाण, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता क्रांतिकुमार मिरजकर आदि उपस्थित होते.
जिल्हाधिकारी अशोक काकडे म्हणाले, एमएसई सीडीपी अंतर्गत तीन क्लस्टर कार्यान्वित झाली आहेत. यामध्ये इंजिनिअरींग क्लस्टर, कुपवाड, डिजीटल प्रिंटिंग क्लस्टर, मिरज आणि रेझिन क्लस्टर, जत सामाईक सुविधा केंद्राचे बांधकाम पूर्ण झाले असून मशिन प्राप्त झाले आहेत. तसेच बेदाणा क्लस्टर चिंचणी, इंजिनिअरींग क्लस्टर कडेगाव, टर्मरिक क्लस्टर इस्लामपूर, लेदर क्लस्टर जत आणि म्युझिकल क्लस्टर मिरज आदि क्लस्टरला मंजुरी मिळाली असून, बांधकाम व मशिनरी स्थापित करण्याचे काम सुरू आहे.
एमआयडीसी क्षेत्रातील रस्ते दुरूस्तीच्या अनुषंगाने उद्योग विभागाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार राज्य शासन 50 टक्के, महापालिका 25 टक्के व उद्योजकांनी 25 टक्के रक्कम भरणे अपेक्षित आहे. याप्रकरणी उद्योजकांनी 25 टक्के रक्कम भरण्यास असमर्थता दर्शवल्याने, या प्रलंबित प्रश्नी महापालिका व नगरविकास विभागाने पर्यायी मार्ग काढावा, असे जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी यावेळी सूचित केले. यानुसार महापालिकेने उद्योजकांशी शुक्रवार दि. 17 ऑक्टोबर रोजी बैठक आयोजित केली आहे
औद्योगिक वसाहतीतील प्रश्नांवर प्राधान्याने व सकारात्मकपणे कार्यवाही करून उद्योजकांचे प्रश्न मार्गी लावण्याबाबत आग्रही असल्याचे सांगत जिल्हाधिकारी अशोक काकडे म्हणाले, फेब्रुवारी 2025 पासून जिल्हा उद्योग मित्र समिती सभेच्या माध्यमातून उद्योजकांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले गेले. यामध्ये कुपवाड जकात नाका ते भारत सूतगिरणीपर्यंतचे अतिक्रमण काढण्यात आले आहे. देशिंग औद्योगिक कार्यक्षेत्रात नियमित वीजवितरण केले जात आहे. कुपवाड ते एमआयडीसीपर्यंत असणारे विजेचे खांब काढण्यात आले आहेत, असे त्यांनी सांगितले.