
वातावरणीय कृती आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी करावी- जिल्हाधिकारी अशोक काकडे- समित्यांच्या आढावा बैठकीत दिली माहिती
सांगली, द प्रतिनिधी) : वातावरणीय बदलाचे आव्हान मानवजातीसमोर उभे आहे. या अनुषंगाने राज्य शासनाने वातावरणीय कृती कक्ष स्थापन करण्याचे निर्देश दिले आहेत. या कक्षाच्या माध्यमातून राज्य वातावरणीय कृती आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी आज येथे दिल्या.
जिल्हा पर्यावरण समितीचे गठण व वातावरणीय कृती कक्षाचे कामकाज या अनुषंगाने आयोजित बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठक कक्षात आयोजित या बैठकीस उपजिल्हाधिकारी विजया यादव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) शशिकांत शिंदे, जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापक विद्या कुलकर्णी, जिल्हा नियोजन अधिकारी अशोक पाटील, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी वि. वि. किल्लेदार, जिल्हा माहिती अधिकारी संप्रदा बीडकर आदि उपस्थित होते.
जिल्हाधिकारी अशोक काकडे म्हणाले, वातावरणीय बदलाचा शहरी व ग्रामीण भागावर विपरीत परिणाम होत आहे. त्यामुळे जिल्ह्याचा वातावरणीय कृती आराखडा तयार करण्यासाठी व त्याची अंमलबजावणी करण्यासाठी समर्पित जिल्हा वातावरणीय कृती कक्ष स्थापन करण्यात येत आहे. या माध्यमातून पर्यावरणाच्या दृष्टीने जिल्ह्यात उद्भवणाऱ्या विशिष्ट आव्हानांचा व त्यांचे निराकरण करण्यासाठी करावयाच्या उपाययोजना आखाव्यात, असे त्यांनी स्पष्ट केले.
जिल्हाधिकारी अशोक काकडे म्हणाले, वातावरणीय कृती कक्षाच्या माध्यमातून हवा आणि पाण्याची गुणवत्ता तपासण्याची कार्यवाही प्रभावीपणे करावी. सांडपाणी व्यवस्थापन व सांडपाणी पुनर्प्रक्रिया याबाबत जनजागृती करावी. जिल्ह्यातील जैवविविधतेचा अभ्यास करावा. वनस्पती, प्राणी, जमीन इत्यादिंचे संरक्षण व संवर्धनाच्या दृष्टीने उपाययोजना आखाव्यात. कारखाना प्रक्रिया परिसर, नागरी वस्तीतील परिसर तसेच सांडपाणी प्रक्रिया संयंत्रणा, परिसर स्वच्छता अभियान राबवावे. यासाठी नियमित बैठक आयोजित करून आढावा घेण्याबाबत त्यांनी यावेळी सूचित केले.
उपप्रादेशिक अधिकारी वि. वि. किल्लेदार यांनी बैठकीचा हेतू विषद करत जिल्हा वातावरणीय कृती कक्षाचे कामकाज व कार्यकक्षा याबाबत माहिती सादर केली. यावेळी जिल्ह्यातील पर्यावरण रक्षण व संवर्धनाच्या दृष्टीने चर्चा करण्यात आली.
00000



