मतदार यादीतील घोळांचे प्रदर्शन: नवी मुंबईत मनसेचा निवडणूक आयोगावर थेट प्रहार!
नवी मुंबई प्रतिनिधी-
नवी मुंबईतील मतदार यादीत झालेल्या गंभीर चुका आणि अनियमितता आता थेट लोकांसमोर आल्या आहेत. मनसेने आज (७ नोव्हेंबर २०२५) वाशी येथे “मतदार यादीतील घोळ” या नावाने धक्कादायक चित्रप्रदर्शनाचे आयोजन केले. या प्रदर्शनाचे उद्घाटन मनसे नेते अमित ठाकरे यांच्या हस्ते झाले.
मनसे प्रवक्ते व शहराध्यक्ष गजानन काळे यांच्या पुढाकारातून भरवण्यात आलेल्या या प्रदर्शनात २० पेक्षा अधिक धक्कादायक घोळ मांडण्यात आले होते.
त्यामध्ये —आयुक्तांच्या निवासस्थानी १२७ मतदारांची नोंद,सुलभ शौचालयात मतदारांची नोंद,आणि पाम बीच रोडवर तब्बल २५० मतदार नोंदवले गेल्याचे समोर आले!त्याशिवाय, कोपरखैराणे परिसरात एकाच मोबाईल क्रमांकावर २८८ मतदार, तर बेलापूर व ऐरोली विधानसभा क्षेत्रांमध्ये मंदिर आणि शाळांचे पत्ते मतदारांच्या नोंदीसाठी वापरलेले असल्याचे आढळले. सीवूड्समध्ये तर तलावाच्या काठावर शेकडो लोक राहत असल्याची नोंद दाखवली गेली, ज्यावर मनसेने “मगरींसोबत मतदार कधीपासून राहू लागले?” असा उपरोधिक प्रश्न उपस्थित केला.
प्रदर्शन पाहिल्यानंतर अमित ठाकरे म्हणाले —हे प्रदर्शन म्हणजे प्रत्येक खऱ्या मतदाराच्या गालावर एक चपराक आहे! निवडणूक आयोगाने दुर्लक्षित केलेल्या चुका मनसेने लोकांसमोर आणल्या आहेत. आता खरे मतदारच मैदानात उतरून या अन्यायाविरुद्ध उभे राहिले पाहिजे!”
या प्रदर्शनास शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हाप्रमुख प्रकाश पाटील, महिला जिल्हाप्रमुख रंजना शिंत्रे, प्रवीण म्हात्रे, अतुल कुलकर्णी आदी मान्यवरांनी भेट दिली.मनसेचे गजानन काळे, सविनय म्हात्रे, विनोद पार्टे, विलास घोणे, सचिन कदम, अभिजीत देसाई, डॉ. आरती धुमाळ, नितीन खानविलकर, संदेश डोंगरे, सनप्रीत तुर्मेकर, अनिकेत पाटील, यशोदा खेडसकर आणि इतर पदाधिकाऱ्यांनी या प्रदर्शनाच्या यशासाठी मोठी मेहनत घेतली.
नवी मुंबईकरांनी मतदार यादीतील या भोंगळ कारभारावर तीव्र संताप व्यक्त करत निवडणूक आयोगाच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.