पुणे विमानतळावरून पहाटेच्या वेळी दिल्लीकडे जाणारे इंडिगो विमानात तांत्रिक बिघाड- प्रवाशांचा गोंधळ
पुणे प्रतिनिधी-पुणे विमानतळावरून पहाटेच्या वेळी दिल्लीकडे जाणारे इंडिगो एअरलाईन्सचे विमान सुमारे तीन तास दहा मिनिटे उशिराने सुटल्यामुळे प्रवाशांमध्ये प्रचंड गोंधळ आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले होते. विमानाला झालेल्या या मोठ्या विलंबामागे तांत्रिक बिघाड कारणीभूत असल्याचे एअरलाईनकडून सांगण्यात आले असले, तरी वेळेवर कोणतीही माहिती न मिळाल्याने संतप्त प्रवाशांनी एअरलाईन कर्मचाऱ्यांना घेराव घातला.
पुणे विमानतळावरून पहाटेच्या वेळी सुटणाऱ्या विमानांमध्ये व्यावसायिक आणि नोकरीसाठी दिल्ली तसेच अन्य शहरांमध्ये जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी असते. अनेक प्रवासी दिल्लीतून पुढील विमाने पकडणार असल्याने त्यांच्यासाठी हा विलंब अत्यंत महत्त्वाचा होता. इंडिगोचे विमान पहाटे चार वाजून वीस मिनिटांनी पुणे विमानतळावरून दिल्लीसाठी उड्डाण करणार होते. मात्र, तांत्रिक कारणांमुळे हे विमान पहाटेच्या निर्धारित वेळेवर उड्डाण करू शकले नाही. अखेरीस, हे विमान सकाळी सात वाजून तीस मिनिटांनी दिल्लीकडे रवाना झाले. यामुळे प्रवाशांना तब्बल तीन तास दहा मिनिटे विमानतळावर ताटकळत बसावे लागले
विमान उड्डाणासाठी वेळेवर सज्ज नसल्यामुळे हा मोठा विलंब झाला. एअरलाईनच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विमानाच्या तपासणीदरम्यान काही तांत्रिक बिघाड आढळून आला. प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक दुरुस्ती पूर्ण करण्यास वेळ लागला, त्यामुळे उड्डाणाला विलंब झाला. मात्र, हा तांत्रिक बिघाड कधी लक्षात आला आणि दुरुस्तीसाठी नेमका किती वेळ लागणार आहे, याची स्पष्ट आणि त्वरित माहिती एअरलाईन कर्मचाऱ्यांनी दिली नाही. यामुळेच गोंधळ अधिक वाढला. पहाटेच्या वेळी विमानतळावर पुरेसे कर्मचारी उपलब्ध नसल्यामुळे प्रवाशांना त्यांच्या प्रश्नांची उत्तरे मिळाली नाहीत. प्रत्येक वेळी वेगवेगळी माहिती मिळत असल्यामुळे प्रवाशांचा संताप वाढला