स्वाधार योजनेचे अर्ज १५ मार्चपर्यंत जमा करा – समाज कल्याण विभागाचे आवाहन
बुलढाणा, प्रतिनिधी: सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या “भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना” अंतर्गत शैक्षणिक सत्र २०२५-२६ साठी अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत १५ मार्च २०२६ पर्यंत निश्चित करण्यात आली आहे.
अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील इयत्ता ११ वी, १२ वी तसेच १२ वी नंतरच्या व्यावसायिक व बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमात शिक्षण घेणाऱ्या आणि शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ दिला जातो. या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना भोजन, निवास व इतर शैक्षणिक खर्चासाठी आर्थिक मदत थेट आधार संलग्न बँक खात्यात जमा केली जाते.
ऑनलाईन अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांनी अर्जातील माहिती अचूक भरून अर्ज ऑनलाईन फॉरवर्ड करावा. तसेच Send Back झालेले अर्ज वेळेत दुरुस्त करून पुन्हा सादर करावेत.
ज्या विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज केला आहे पण अर्जाची हार्डकॉपी व आवश्यक कागदपत्रे जमा केलेली नाहीत, त्यांनी ती १५ मार्च २०२६ पर्यंत सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, बुलढाणा येथे जमा करावीत.जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहाय्यक आयुक्त मनोज मेरत यांनी केले आहे.