
‘उल्लास’ साक्षरता अभियानाची परीक्षा आता 29 मार्चला;नोंदणी पूर्ण करण्याचे आदेश
अमरावती, प्रतिनिधी: केंद्र शासन पुरस्कृत ‘उल्लास – नवभारत साक्षरता कार्यक्रम’ अंतर्गत जिल्ह्यात होणारी पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान मूल्यमापन चाचणी (FLNAT) परीक्षेच्या नियोजनात बदल करण्यात आला आहे. 15 मार्च रोजी होणारी ही परीक्षा आता रविवार, दि. 29 मार्च 2026 रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत घेतली जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
जिल्ह्यात या मोहिमेअंतर्गत असाक्षरांची नोंदणी आणि पोर्टलवर त्यांचे टॅगींग करण्याचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. हे तांत्रिक काम पूर्ण करण्यासाठी आणि साक्षरता वर्गातील उमेदवारांना परीक्षेसाठी अधिक वेळ मिळावा, या उद्देशाने राज्यस्तरावरून परीक्षेचा दिनांक पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
प्रलंबित असलेले नोंदणी व टॅगींगचे काम तातडीने पूर्ण करावे, अशा सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत. तसेच, साक्षरता वर्ग नियमितपणे सुरू ठेवून शिक्षकांनी या वर्गांना भेटी द्याव्यात आणि उमेदवारांकडून प्रश्नपत्रिकांचा सराव करून घ्यावा, असेही सांगण्यात आले आहे.
0000000



