निराधार योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीत अहिल्यानगर जिल्हा अव्वल !उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सन्मान…
राज्य प्रतिनिधी अहिल्यानगर, : जिल्ह्यात सामाजिक विशेष सहाय्य योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीत उल्लेखनीय यश मिळवत अहिल्यानगर जिल्ह्याने राज्यात अव्वल स्थान पटकावले आहे. जिल्ह्यातील १ लाख ३८ हजार लाभार्थ्यांना तब्बल २४८ कोटी ३८ लाख २४ हजार रुपयांचे अनुदान थेट लाभ हस्तांतरण प्रणालीद्वारे वितरित करण्यात आले आहे. या यशस्वी कामगिरीबद्दल उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्या हस्ते प्रशस्तीपत्रक व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
जिल्ह्यात राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना, तसेच केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्तीवेतन योजना आणि राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना प्रभावीपणे राबविण्यात येत आहेत. या सर्व योजनांतील पात्र लाभार्थ्यांचे शंभर टक्के आधार संलग्नीकरण पूर्ण करण्यात आले असून, त्यांच्या खात्यांमध्ये थेट अनुदान जमा करण्याची प्रक्रिया यशस्वीरीत्या राबविण्यात आली आहे. तसेच, दिव्यांग लाभार्थ्यांचे यूडीआयडी कार्ड योजनांशी संलग्न करण्याचे कामही पूर्ण करण्यात आले आहे.
योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हास्तरावर उत्कृष्ट कामगिरी करणारे जिल्हा समन्वयक रविंद्र ज्ञानदेव घावटे व महसूल सहाय्यक श्रीमती शाजिया सलीम पठाण यांना महसूल अधिकाऱ्यांच्या बैठकीत जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्या हस्ते गौरविण्यात आले. यावेळी अपर जिल्हाधिकारी शैलेश हिंगे व बाळासाहेब कोळेकर, तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व उपजिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार व नायब तहसीलदार उपस्थित होते.
तालुकास्तरावर प्रत्यक्ष अंमलबजावणीत मोलाचे योगदान देत उद्दिष्ट साध्य करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचाही सन्मान करण्यात आला. यामध्ये संजय गांधी योजनेचे तहसीलदार शीतलकुमार सावळे, कोपरगावचे तहसीलदार महेश सावंत व तालुका समन्वयक श्रीमती अर्चना जायकर, श्रीरामपूरचे नायब तहसीलदार दत्तात्रय शेकटकर व श्रीमती निर्मला नाईक, तसेच अहिल्यानगर तहसील कार्यालयाचे नायब तहसीलदार गणेश भानवसे व तालुका समन्वयक श्रीमती वैष्णवी दुधाळ यांचा समावेश आहे.
जिल्हा प्रशासनाच्या समन्वित प्रयत्नांमुळे निराधार व वंचित घटकांपर्यंत शासकीय योजनांचा लाभ प्रभावीपणे पोहोचत असून, पारदर्शक व वेगवान अंमलबजावणीमुळे जिल्ह्याने राज्यात आदर्श निर्माण केला आहे.