
१ मे पासून महाराष्ट्रात जनगणनेचा श्रीगणेशा! नागरिकांनी सहभाग नोंदवावा; संचालक निरुपमा डांगे यांचे आवाहन
महाराष्ट्र राज्यातील जनगणना संचालन आणि नागरिक नोंदणी विभागातर्फे १ मे पासून जनगणनेच्या कामाला सुरुवात होत आहे. या प्रक्रियेत राज्यातील सर्व नागरिकांनी सक्रिय सहभाग घ्यावा,असे आवाहन संचालक निरुपमा डांगे यांनी केले आहे.
केंद्र सरकारच्या डिजिटल इंडिया उपक्रमाप्रती असलेल्या वचनबद्धतेनुसार माहिती संकलन आणि प्रसाराची गुणवत्ता तसेच कार्यक्षमता सुधारण्यासह निर्धारित वेळेत कार्य पूर्ण करण्याच्या उद्देशाने जनगणना २०२७ व्यापक प्रमाणात डिजिटल तंत्रज्ञानाचा अवलंब करणार आहे. भारतीय जनगणनेच्या इतिहासात प्रथमच स्व-गणना पध्दत सुरु करण्यात आली असून त्या माध्यमातून व्यक्तींना जनगणनेशी निगडित त्यांचा कौटुंबिक तपशील स्वतंत्रपणे ऑनलाइन पूर्ण भरता येईल, आणि सादर करता येईल, अशी माहिती महाराष्ट्राच्या मुख्य प्रधान जनगणना अधिकारी, डॉ. निरुपमा जे. डांगे यांनी पत्रकार परिषदेत दिली.



