अमेरिका इजराइल-इराण संघर्षामुळे आजची परिस्थितीवर उद्योगपती आणि कोटक महिंद्रा बँकेचे संस्थापक उदय कोटक काय म्हणाले ते पहा
राज्य प्रतिनिधी-अमेरिका इजराइल-इराण संघर्षामुळे आजची परिस्थितीवर उद्योगपती आणि संस्थापक उदय कोटक काय म्हणाले ते पहा,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना सोनं खरेदी न करण्याचे तसंच किमान पुढील वर्षभर परदेश दौरे न करण्याचे आवाहन केले . याचा परिणाम बाजारात दिसत असून, शेअर मार्केटवरही पडसाद उमटत आहेत. मध्यपूर्वेत सुरु असलेलं युद्ध आणि कच्च्या तेलाचा पुरवठा पूर्णपणे सुरळीत न झाल्याने हे आवाहन करण्यात आलं असताना, विविध क्षेत्रातून यावर प्रतिक्रिया उमटत आहेत. उद्योगपती आणि कोटक महिंद्रा बँकेचे संस्थापक उदय कोटक यांनीदेखील वाढत्या ऊर्जा किमतींमुळे भारतीयांसमोर उभं राहू शकणाऱ्या संभाव्य आर्थिक धक्क्याबाबत चिंता व्यक्त केली आहे.
‘कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री’ (CII) च्या एका कार्यक्रमात उदय कोटक यांनी नमूद केलं की, भारताने खऱ्या अर्थाने आर्थिक आत्मनिर्भर होण्यासाठी परकीय भांडवलावरील आपलं अवलंबित्व कमी करणं आणि दीर्घकालीन जोखीम भांडवलाचा (risk capital) एक मजबूत देशांतर्गत साठा निर्माण करण्यावर आपलं सर्व लक्ष केंद्रित करणं गरजेचे आहे.
मागील दोन महिन्यांपासून अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्ध आणि त्यामुळे निर्माण झालेल्या संघर्षामुळे सामान्य ग्राहकांसाठीच्या इंधनाच्या किमतींवर अद्याप तरी फारसा मोठा परिणाम झालेला नाही असंही त्यांनी नमूद केलं. “परंतु आपण सर्वात वाईट परिस्थितीचा सामना करण्यासाठी सज्ज राहिलं पाहिजे. हा पूर्वतयारीचा एक भाग आहे. धक्का बसण्याची वाट पाहत बसण्यापेक्षा, कठीण काळाचा सामना करण्यासाठी आपण आधीच तयार असायला हवं,” असं कोटक म्हणाले.
अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील संघर्षामुळे जागतिक वातावरण अधिकाधिक विस्कळीत होत असताना वेगवेगळे देश आपल्या स्वतःच्या धोरणात्मक हितांना प्राधान्य देत आहेत. ज्यामुळे भारताने देशांतर्गत आर्थिक पाया बळकट करणं फार महत्त्वाचं आहे
एखाद्या वित्त व्यावसायिकाच्या दृष्टीने हे विधान उत्तेजक असल्याचं सांगताना कोटक म्हणाले, “भारताचे ‘वित्तीयीकरण’ खूपच लवकर झाले आहे.” त्यांनी सांगितलं की, अनेक कंपन्या तीन ते पाच वर्षांच्या दीर्घकाळासाठी दृष्टीकोन ठेवत व्यावसाय उभारत नाहीत. याउलट त्रैमासिक नफा, स्टॉकच्या किंमीत आणि कर्मचाऱ्यांच्या ‘स्टॉक ऑप्शन्स’मधून मिळणारा फायदा यावरच लक्ष केंद्रित करत आहेत.
“मी कंपन्यांना आग्रहाने आवाहन करेन की, त्यांनी कमी काळातील स्टॉक किंमतीवर लक्ष केंद्रित करू नये… त्याऐवजी, पुढील तीन ते पाच वर्षांच्या कालावधीत आपली कंपनी कशा प्रकारे उभी करायची, याचा विचार करावा,” असं त्यांनी नमूद केलं.
कोटक यांनी सांगितलं की, भारत अनेक वर्षांपासून परदेशी पोर्टफोलिओ गुंतवणुकीवर मोठ्या प्रमाणावर अवलंबून होता आणि करोनानंतर देशांतर्गत गुंतवणूकदारांनी भांडवली बाजारात मोठी भूमिका बजावण्यास सुरुवात केली. त्यांनी कंपन्यांना केवळ मोठे ट्रेझरी पोर्टफोलिओ सांभाळण्याऐवजी नफ्याची पुनर्गंतवणूक करण्याचे आवाहन केले. “कॉर्पोरेट इंडियाचा कर दर प्रचंड आहे. तुम्ही त्याचे काय केले आहे? आपण पुनर्गंतवणूक करत आहोत की कॉर्पोरेट ट्रेझरी चालवत आहोत?” असा प्रश्न त्यांनी विचारला.
सरकारे सामान्यतः भांडवलाचे वाटप योग्य प्रकारे करत नाहीत आणि केवळ विद्यमान कर सवलतींवर अवलंबून राहण्याऐवजी, अतिरिक्त गुंतवणूक भत्त्यांद्वारे नवीन गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्यावर धोरणात्मक पाठिंब्याने लक्ष केंद्रित केले पाहिजे, असं त्यांनी सांगितलं.