
सांगली जिल्ह्यात 4 कोटी 80 लाखांचा संभाव्य पाणी टंचाई कृती आराखडा- सद्यस्थितीत एक टँकर, 7 विहिरींद्वारे पाणीपुरवठा – मागणी व आवश्यकतेनुसार नियोजन
सांगली, प्रतिनिधी: सांगली जिल्ह्यात पाणीटंचाईच्या समस्येवर मात करण्यासाठी जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभाग सज्ज असून, जिल्ह्यात एकूण 66 टँकर्स तसेच 126 विहिरींचे अधिग्रहण व 9 विंधन विहिरी घेणे अशा उपाययोजनांसाठी सुमारे 4 कोटी 80 लाख 48 हजार रुपयांचा संभाव्य पाणीटंचाई कृती आराखडा तयार आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात एक टँकर व सात विहिरी/बोअरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली आवश्यक उपाययोजना करण्यात येत असल्याची माहिती जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता संजय येवले यांनी दिली.
दरवर्षी 1 ऑक्टोबर ते 30 जून या कालावधीसाठी टंचाई कृती आराखडा तयार केला जातो. त्यानुसार सन 2025-26 साठी जिल्ह्यात एकूण 66 टँकर्स तसेच 126 विहिरींचे अधिग्रहण व 9 विंधन विहिरी घेणे अशा उपाययोजनांसाठी सुमारे 4 कोटी 80 लाख 48 हजार रुपयांचा संभाव्य पाणीटंचाई कृती आराखडा तयार आहे. तसेच, ग्रामीण भागात नागरिकांना सुरळीत पाणीपुरवठा व्हावा यासाठी मागणीनुसार आणि आवश्यकतेनुसार टँकर सुरू करणे तसेच विहिरींचे अधिग्रहण करण्याचे नियोजन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
सध्या जिल्ह्यात काही गावांमध्ये विहीर व बोअरचे अधिग्रहण करून पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. त्यानुसार खानापूर तालुक्यातील रेवणगाव आणि ऐनवाडी येथे प्रत्येकी दोन बोअर विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत. तसेच शिराळा तालुक्यातील बांबवडे येथे एक बोअर तर करमाळे येथे एक बोअर आणि एक विहीर अधिग्रहित करण्यात आली आहे. अशा प्रकारे एकूण सात बोअर/विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे.
दरम्यान, टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी आटपाडी तालुक्यातील पिंपरी खु. (चव्हाण वस्ती) येथे एक शासकीय टँकर सुरू करण्यात आला आहे. प्रशासनाकडून परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवण्यात येत असून, ज्या भागांत पाणीटंचाईची तीव्रता वाढेल त्या ठिकाणी जिल्हा परिषद आणि ग्रामीण पाणी पुरवठा विभागाकडून आवश्यक त्या सर्व उपाययोजना वेळोवेळी करण्यात येत आहेत.
00000



