vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

शिर्डीत खासगी क्षेत्रातील देशातील सर्वात मोठ्या संरक्षण कारखान्याचे २३ मे रोजी संरक्षणमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन ! जिल्ह्यात संरक्षण उत्पादन क्षेत्राला मोठी चालना !१५५ मिली मीटरचे प्रतिवर्षी पाच लाख तोफगोळे तयार होणार

शिर्डीत खासगी क्षेत्रातील देशातील सर्वात मोठ्या संरक्षण कारखान्याचे २३ मे रोजी संरक्षणमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन ! जिल्ह्यात संरक्षण उत्पादन क्षेत्राला मोठी चालना !१५५ मिली मीटरचे प्रतिवर्षी पाच लाख तोफगोळे तयार होणार

शिर्डी, प्रतिनिधी:- अहिल्यानगर जिल्ह्यात प्रथमच मोठ्या प्रमाणावर संरक्षण साहित्य उत्पादन उद्योग उभा राहत असून, शिर्डी येथील सावळीविहीर औद्योगिक वसाहतीत उभारण्यात आलेल्या तोफगोळा उत्पादन प्रकल्पाचे उद्घाटन येत्या २३ मे रोजी संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांच्या हस्ते होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपस्थित राहणार असून, या प्रकल्पामुळे जिल्हा देशातील महत्त्वाचे संरक्षण उत्पादन केंद्र म्हणून विकसित होणार असल्याची माहिती जलसंपदामंत्री तथा पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील व ग्लोब फोर्ज लिमिटेडचे संचालक तथा चेअरमन रविकांत यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिली.

या प्रकल्पामध्ये १५५ मिलीमीटर क्षमतेच्या तोफगोळ्यांचे उत्पादन करण्यात येणार असून, प्रतिवर्षी पाच लाख तोफगोळे तयार करण्याची क्षमता या कारखान्याची असेल. खाजगी क्षेत्रातील तोफगोळा उत्पादनाची ही देशातील सर्वांत मोठी क्षमता मानली जात असून, संपूर्ण उत्पादन तंत्रज्ञान व कच्चा माल स्वदेशी आहे. हा प्रकल्प अवघ्या एका वर्षात उभारण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘आत्मनिर्भर भारत’, ‘मेक इन इंडिया’ व ‘मेक फॉर द वर्ल्ड’ या संकल्पनांना बळ देणारा हा महत्त्वाचा प्रकल्प असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.

शिर्डी औद्योगिक वसाहतीतील सुमारे दोनशे एकर क्षेत्रावर विविध संरक्षण प्रकल्प विकसित करण्यात येत आहेत. यामध्ये रॉकेट लाँचर, लांब पल्ल्याच्या रॉकेटचे सुटे भाग, स्वयंचलित ड्रोन व विविध इलेक्ट्रॉनिक यंत्रणांच्या चाचणी सुविधा विकसित केल्या जात आहेत. या प्रकल्पांसाठी सुमारे एक हजार कोटी रुपयांची गुंतवणूक प्रस्तावित असून, त्यापैकी सहाशे कोटी रुपयांची गुंतवणूक पूर्ण झाली आहे. या माध्यमातून सुमारे दोन हजार नागरिकांना प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगार उपलब्ध होणार आहे. याच दिवशी प्रतिदिन पंधरा टन क्षमतेच्या बायो-सीएनजी प्रकल्पाचेही उद्घाटन करण्यात येणार आहे.अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी येथे राज्य शासनाने उपलब्ध करून दिलेल्या सुमारे सहाशे एकर जागेवर भव्य दारूगोळा निर्मिती संकुल उभारण्यात येत आहे. या संकुलात टीएनटी, आरडीएक्स, एचएमएक्ससारखी विविध स्फोटके व प्रणोदक तयार करणारे कारखाने उभारले जात असून, त्यासाठी सुमारे दोन हजार कोटी रुपयांची अतिरिक्त गुंतवणूक प्रस्तावित आहे. दरवर्षी वीस हजार टन टीएनटी उत्पादनाची क्षमता येथे निर्माण होणार असून, सरकारी व खासगी क्षेत्रातील ही देशातील सर्वांत मोठी क्षमता ठरणार आहे. टीएनटी व आरडीएक्स निर्मितीचे कारखाने पूर्णपणे स्वदेशी तंत्रज्ञानावर आधारित असून, त्यांचे उद्घाटन व सादरीकरण लवकरच होणार आहे.

शिर्डी येथे तयार होणाऱ्या तोफगोळ्यांमध्ये स्फोटके भरण्याचे महत्त्वाचे काम अहिल्यानगर येथील प्रस्तावित कारखान्यात केले जाणार आहे. सर्व प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यानंतर जिल्ह्यातील सुमारे चार ते पाच हजार तरुणांना प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगार उपलब्ध होणार असल्याचे पालकमंत्री डॉ. विखे पाटील यांनी सांगितले. जिल्ह्यातील सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांनाही या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर संधी उपलब्ध होणार आहेत.अहिल्यानगर जिल्ह्याला संरक्षण क्षेत्राची ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेली असून, रणगाडा प्रशिक्षण केंद्र, के.के. रेंजेस व मेकॅनाईज्ड इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरमुळे जिल्ह्याला आधीपासूनच संरक्षण क्षेत्रातील महत्त्व आहे. नव्या प्रकल्पांमुळे या ओळखीला अधिक बळ मिळणार असल्याचेही यावेळी नमूद करण्यात आले. शिर्डी हे धार्मिक स्थळ असल्याने प्रदूषणाचा धोका टाळण्यासाठी हा प्रकल्प विशेष रासायनिक क्षेत्रात उभारण्यात आला आहे.

स्थानिक युवकांना रोजगारासाठी सक्षम करण्याच्या उद्देशाने उद्योगांच्या गरजेनुसार कौशल्य विकासावर विशेष भर देण्यात येत आहे. रतन टाटा ट्रस्टच्या सहकार्याने औद्योगिक वसाहतीमध्ये विशेष इनोव्हेशन सेंटर सुरू करण्यात येत असून, त्यासाठी दोनशे कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. एमआयडीसीकडूनही पन्नास कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे. राहाता येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे स्थलांतर एमआयडीसी परिसरात करण्यात आले असून, भविष्यातील विस्तारासाठी सुपे परिसरात संरक्षण विभागाच्या जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया प्राथमिक स्तरावर सुरू असल्याची माहितीही देण्यात आली.

या उद्घाटनाच्या निमित्ताने २३ व २४ मे रोजी विशेष संरक्षण प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. देशातील प्रमुख संरक्षण उत्पादन कंपन्या व शंभरहून अधिक सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग या प्रदर्शनात सहभागी होणार आहेत. जिल्हाभरातून नागरिक या प्रदर्शनाला भेट देतील व तरुणांसाठी संरक्षण क्षेत्रातील संधी जाणून घेण्याची ही मोठी संधी ठरणार असल्याचे पालकमंत्री डॉ. विखे पाटील यांनी सांगितले.

00000

संबंधित पोस्ट

दिव्यांगांसाठी काम करणाऱ्या संस्थांनी31 डिसेंबरपर्यंत नोंदणी करण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून बारामती तालुक्यातील नुकसानग्रस्त भागांची पाहणी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली देशाचे नवे सरन्यायाधीश भूषण गवई यांची सदिच्छा भेट

रिझर्व बँक ऑफ इंडिया’तर्फे गुरुवारी (दि.२०) ‘टाऊन हॉल बैठक’

मुंबईतील कनेक्टिव्हिटीचे प्रकल्प युद्धपातळीवर पूर्ण करण्यात येणार-मुख्यमंत्री फडणवीस· आयआयएमयूएन आयोजित ‘युथ कनेक्ट’ कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांचे प्रतिपादन

vishwatmaklokswamivarta

१० वीची पुस्तके दान अभियानातून महिलांचे शैक्षणिक सक्षमीकरण; नागरिकांना सहभागाचे आवाहन-मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांच्या संकल्पनेतून उपक्रम