कर्मांचा न्याय अटळ; आत्मपरीक्षण व धर्माचरणातूनच मोक्षप्राप्ती : महासती श्री निर्मलाजी म.सा.
जालना | प्रतिनिधी :”जीवाने केलेल्या प्रत्येक शुभ-अशुभ कर्माचा लेखाजोखा अचूक असतो. धन, सत्ता, प्रतिष्ठा किंवा प्रभावाच्या जोरावर कर्मफळ बदलता येत नाही. कर्माचा न्याय सर्वांसाठी समान असून आत्मपरीक्षण, सदाचार, संयम आणि धर्माचरण यांच्याद्वारेच आत्मकल्याण व मोक्षप्राप्तीचा मार्ग खुला होतो,” असे प्रतिपादन महासती श्री निर्मलाजी म.सा. यांनी आपल्या ओजस्वी प्रवचनात केले
भगवान महावीर आणि गौतम स्वामी यांच्या संवादाचा आधार घेत त्यांनी कर्मसिद्धांताचे अत्यंत मार्मिक विवेचन केले. पूर्वजन्मात सत्ता, अहंकार, अन्याय, हिंसा, लोभ, भ्रष्टाचार आणि प्रजेवर केलेल्या अत्याचारांचे परिणाम जीवाला पुढील अनेक जन्मांत भोगावे लागतात. मनुष्य कितीही सामर्थ्यवान असला तरी कर्माच्या न्यायापासून त्याची सुटका होत नाही. पापकर्मांचा परिणाम दुःख, वेदना आणि अधोगतीच्या रूपाने समोर येतो, तर सत्कर्म आत्मोन्नती आणि मोक्षाचा मार्ग प्रशस्त करतात, असे त्यांनी सांगितले.
प्रवचनादरम्यान त्यांनी भगवान महावीरांनी गौतम स्वामींना सांगितलेल्या एका प्रसंगाचे विवेचन करत, पूर्वजन्मी सत्तेचा गैरवापर करून प्रजेला छळणाऱ्या व्यक्तीला पुढील जन्मांत भीषण यातना कशा भोगाव्या लागल्या, याचे हृदयस्पर्शी वर्णन केले. हा प्रसंग सांगताना त्यांनी उपस्थितांना कर्मबंधनाचे गांभीर्य समजावून सांगत, प्रत्येकाने आपल्या कृतींबाबत सजग राहण्याचे आवाहन केले.
त्या म्हणाल्या की, आजच्या काळात धन आणि सत्तेच्या मोहापायी अनेकजण सत्य, न्याय आणि नैतिकतेचा मार्ग सोडतात. भ्रष्टाचार, लाचलुचपत, शोषण, अन्याय आणि स्वार्थाच्या आधारे मिळवलेले यश क्षणिक असते; मात्र त्यातून निर्माण होणाऱ्या कर्मबंधनाचे परिणाम अनेक जन्मांपर्यंत जीवाला भोगावे लागतात. त्यामुळे इतरांच्या दोषांकडे बोट दाखविण्याऐवजी प्रत्येकाने स्वतःच्या आचरणाचे आत्मपरीक्षण करून जीवनात सत्य, अहिंसा, दया, क्षमा, संयम आणि त्याग या मूल्यांचा स्वीकार करावा
यावेळी त्यांनी राजस्थानच्या इतिहासातील राणी पद्मिनी यांच्या त्याग, धर्मनिष्ठा, दूरदृष्टी आणि राष्ट्रहितासाठी घेतलेल्या निर्णयाचा प्रेरणादायी प्रसंग कथन केला. वैयक्तिक स्वार्थापेक्षा समाज, संस्कृती आणि धर्मरक्षणाला प्राधान्य देणारे जीवनच खऱ्या अर्थाने आदर्श ठरते. संकटाच्या प्रसंगी संयम, विवेक आणि कर्तव्यभावना जपणारी व्यक्तीच इतिहास घडवते, असे त्यांनी नमूद केले.
प्रवचनाच्या शेवटी महासती श्री निर्मलाजी म.सा. यांनी उपस्थितांना धर्मश्रवणाबरोबरच धर्माचे आचरण जीवनात उतरविण्याचे आवाहन केले. मन, वचन आणि कर्म यांची शुद्धी साधत आत्मजागृतीचा मार्ग स्वीकारल्यासच जीवन सार्थक होऊन मोक्षमार्गाची वाट सुकर होते, असा संदेश त्यांनी दिला.
या धर्मसभेला ध्यानयोगी आचार्य पूज्य श्री शिवमुनिजी म.सा. यांच्या आज्ञानुवर्ती, आगम गगनचंद्रिका, संयम सुमेरू, गुरुणीमैया महासाध्वी पूज्य श्री कौशल्याजी म.सा. ‘श्रमणी’ यांच्या प्रशिष्य तथा स्वर्ण संयमज्योती उपप्रवर्तिनी महासती श्री प्रमिलाजी म.सा. यांच्या सुशिष्य तपकौमुदी उपप्रवर्तिनी महासती श्री निर्मलाजी म.सा., तपचंद्रिका महासती श्री नंदिनीजी म.सा., महासती श्री उपमाजी म.सा., महासती श्री उपासनाजी म.सा. तसेच महासती श्री ऋषिताजी म.सा. (आदि ठाणा ५) यांची पावन उपस्थिती लाभली. प्रवचनाचा लाभ घेण्यासाठी मोठ्या संख्येने श्रावक-श्राविका उपस्थित होते..छायाचित्र : दर्पण जैन