पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली ‘बिमा सखी योजने’चा ऐतिहासिक शुभारंभ” – शिवराज सिंह चौहान
राज्य प्रतिनिधी-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली ‘बिमा सखी योजने’चा ऐतिहासिक शुभारंभ आम्ही यशस्वीरित्या केला आहे, असे ‘बिमा सखी योजने’बद्दल बोलताना, केंद्रीय ग्रामीण विकास तसेच कृषी आणि कृषक कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आज सांगितले. ही योजना केवळ महिला सक्षमीकरणाच्या दिशेनेच नाही तर ग्रामीण आणि निमशहरी भारताला आर्थिक सुरक्षा प्रदान करण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल आहे, असेही त्यांनी सांगितले. देशातील प्रत्येक महिलेला स्वावलंबी आणि आर्थिकदृष्ट्या मजबूत बनवण्याचा सरकार वचनबद्ध असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
ग्रामीण विकास मंत्रालयाने भारत सरकारचे ‘2047 पर्यंत सर्वांसाठी विमा’ हे ध्येय साकार करण्यासाठी भारतीय जीवन विमा महामंडळ (LIC) सोबत एक महत्त्वाची भागीदारी केली आहे, अशी माहिती त्यांनी दिली. राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियानाच्या वित्तीय समावेशन उपक्रमांतर्गत, देशभरातील बचत गटांमधील (SHG) प्रशिक्षित महिलांना ग्रामपंचायत स्तरावर ‘बिमा सखी’ म्हणून नियुक्त केले जाईल, अशी माहिती त्यांनी दिली.
‘बिमा सखी’ ही योजना ग्रामीण तसेच शहरी पातळीवर स्थानिक रोजगार निर्मिती आणि महिलांच्या कामगार सहभागाच्या दिशेने एक नवीन अध्याय लिहीत आहे, असे मंत्री म्हणाले. ही योजना सरकारच्या महत्त्वाच्या योजनांशी सुसंगत असून ती जन-धन से जन सुरक्षा, डिजिटल इंडिया आणि महिला कौशल्य विकास यासारख्या योजनांना बळकटी देते. याशिवाय, आपत्ती संरक्षणातही योगदान देणारी ही योजना आपत्तीग्रस्त भागातील ग्रामीण कुटुंबांसाठी आर्थिक कवच म्हणून काम करेल.
सर्व राज्ये आणि भागीदार संस्थांना या लोक चळवळीत सामील होण्याचे तसेच ‘विमा सखी योजना’ प्रत्येक गावापर्यंत आणि प्रत्येक घरापर्यंत पोहोचवण्यासाठी एकत्रितपणे प्रयत्न करण्याचे आवाहनही त्यांनी केले.