नवी मुंबई प्रतिनिधी- नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने वाशी से.17 येथे पामबीच मार्गावरुन पुण्याकडे जाण्याकरिता सायन पनवेल महामार्गापर्यंत उड्डाणपूल आर्मचा लोकार्पण समारंभ महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री ना.श्री.गणेश नाईक यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. याप्रसंगी नवी मुंबईच्या महापौर श्रीम.सुजाता पाटील, उपमहापौर श्री.दशरथ भगत, ड प्रभाग समितीचे सभापती श्री.प्रकाश मोरे, आरोग्य समिती सभापती डॉ जयाजी नाथ, पाणीपुरवठा व मलनि:स्सारण समिती सभापती श्री.रविकांत पाटील, क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रम समिती सभापती श्री.गिरीश म्हात्रे, नगरसेवक श्री.शशिकांत राऊत, श्री.शशिकांत भोईर, श्री.सुरज पाटील, श्री.निशांत भगत, श्री.संदिप म्हात्रे, श्री.भरत नखाते, उपआयुक्त श्री.सोमनाथ पोटरे, सहा.आयुक्त तथा विभाग अधिकारी श्री.सुखदेव येडवे व श्री.सागर मोरे आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी प्रसार माध्यमांशी बोलतांना वनमंत्री ना.श्री.गणेश नाईक यांनी नवी मुंबईतून पामबीच रस्त्यावरुन पुण्याकडे जाण्यासाठी बनविण्यात आलेला जोडरस्ता हा अत्यंत उपयोगी असल्याचे सांगत ही कल्पना ज्यांना सूचली व ज्यांनी अंमलात आणली त्या घटकांचे कौतुक केले. नवी मुंबई शहराच्या रचनेमधील त्रुटी दूर करणारा हा प्रकल्प असल्याचे सांगत शहर अंतर्बाह्य सुंदर दिसण्यासाठी यापुढील काळात काम केले जाईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी आर्म उड्डाणपूलावरून पहिला प्रवास दिव्यांग व्यक्तींसाठी असलेल्या दुचाकी वाहनाव्दारे श्री. वैभव ठाकूर यांनी केला. मंत्रीमहोदयांच्या शुभहस्ते त्यांना पुष्पगुच्छ देऊन सन्मानीत करण्यात आले. याप्रसंगी शहर अभियंता श्री.शिरीष आरदवाड यांच्या नियंत्रणाखाली कार्यरत आर्म उड्डाणपूल बांधकामाशी संबधीत कार्यकारी अभियंता श्री.पंढरीनाथ चौडे, उपअभियंता श्री.अमित पावरा, कनिष्ठ अभियंता श्री.रोहित पिंपळे तसेच वास्तुविशारद व कंत्राटदार यांच्या प्रतिनिधींचाही सन्मान करण्यात आला.
पामबीच मार्गावरुन सायन पनवेल महामार्ग पर्यंत जाण्यासाठी से.17, वाशी येथे 18 कोटी 32 लक्ष रक्कम खर्च करुन 290 मी. लांबीचा व 6.50 मी. रुंदीचा आर्म उड्डाणपूल बांधण्यात आला असून यामुळे वाशी पामबीच सिटी बॅंक जवळील चौकातून थेट सायन पनवेल महामार्गावर जाणे सोपे होणार आहे. सध्या पामबीच मार्गावरुन सायन पनवेल महामार्गावर जाण्यासाठी सानपाडा येथून मोठा वळसा घालून जावे लागत असून या आर्म उड्डाणपूलामुळे नागरिकांचा 10 ते 15 मिनिटांचा वेळ वाचून इंधनाचीही बचत होणार आहे. त्यामुळे नवी मुंबईतील वाहतूकीच्या नियोजनासाठी ही मोठी उपलब्धी आहे.