छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी- जिल्ह्यात विविध विभागांमार्फत होत असलेल्या विकासकामांचा आज राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी आढावा घेतला.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिल्हा नियोजन समिती सभागृहात ही बैठक पार पडली. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, मनपा आयुक्त जी. श्रीकांत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना, पोलीस अयुक्त प्रवीण पवार, पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड, अपर जिल्हाधिकारी डॉ. अरविंद लोखंडे, निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर, जिल्हा नियोजन अधिकारी भारत वायाळ तसेच सर्व यंत्रणाप्रमुख उपस्थित होते.
विभागनिहाय जिल्ह्यात सुरु असलेले महत्त्वाचे प्रकल्प, तसेच त्या प्रकल्पांची सद्यस्थिती, संभाव्य अडचणी त्यावर काढावयाचा तोडगा यासंदर्भात चर्चा करण्यात आली. जिल्हा नियोजन समितीमार्फत देण्यात आलेला निधी, त्यानिधीतून होणाऱ्या कामांची सद्यस्थितीबाबत आढावा घेण्यात आला.
पालकमंत्री शिरसाट म्हणाले की, निधीचा विनियोग जनहिताच्या दृष्टीने आवश्यक कामांसाठी करा. जनहित हा प्राधान्यक्रमाचा निकष असायला हवा त्यानुसार विकासकामांचा प्राधान्यक्रम ठरवा. सौर उर्जा, शाळा बांधकामे यासारखी कामे तसेच पोलीस दलाचे अत्याधुनिकरण याबाबींना प्राधान्य द्यावे. जी कामे प्रलंबित आहेत त्याकामांना प्राध्यान्याने पूर्ण करा. प्रत्येक विभागाने काम करतांना कामाचा दर्जा हा उत्तम राखावा,असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.पालकमंत्र्यांच्या हस्ते ॲग्रीस्टॅक योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना प्रमाणपत्र वितरण करण्यात आले.०००००