आपत्ती व्यवस्थापन परिचय प्रशिक्षण कार्यक्रमास प्रारंभ’सदैव सज्ज’,हाच आपत्ती व्यवस्थापनाचा मंत्र-जिल्हाधिकारी दिलीप स्वामी
छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी- आपत्ती ही काही सांगून येत नाही. मात्र सततचा अभ्यास, प्रशिक्षणाद्वारे सदैव सज्ज राहिल्यास आपण संभाव्य आपत्तीचा सामना करून जीवित व वित्त हानी टाळू शकतो, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी केले.
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन परिचय प्रशिक्षण कार्यक्रमाचा आज सरस्वती भुवन विद्यामंदिरात प्रारंभ करण्यात आला. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनोद खिरोळकर, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी मारुती म्हस्के, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे लेफ्ट. आर. जी. यादव, सरस्वती भुवन शिक्षण संस्थेचे अध्यक्ष ऍड. दिनेश वकील, डॉ. रश्मी बोरीकर, मुख्याध्यापक निकुंभ, डॉ. सविता मुळे,श्रीमती आश्विनी भोसले आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी स्वामी म्हणाले की, आपत्तीचे अनुमान करता येत नाही. मात्र आपत्तीचा सामना करण्यासाठी आपण सज्ज राहू शकतो. या परिचय प्रशिक्षण कार्यक्रमाद्वारे आपण हिच सज्ज असण्याची तयारी करत आहोत. आपल्या घरातील लहान लहान प्रसंगात ही सज्जता आपल्याला उपयोगी पडते. शालेय विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासक्रमाचा भाग म्हणून हे प्रशिक्षण देऊन आपत्ती व्यवस्थापन सज्ज नागरिक घडवण्याचे उद्दिष्ट आहे. हेच विद्यार्थी उद्याचे नागरिक आहेत. या प्रशिक्षण कार्यक्रमाचे विविध सत्र जिल्ह्यात आयोजित केले आहेत. आपत्ती व्यवस्थापनातून सज्जतेचे धडे घेऊन येणाऱ्या आपत्तीना आपण सामोरे जाण्यासाठी सज्ज होऊ.
प्रास्ताविक आश्विनी भोसले यांनी तर अध्यक्षीय समारोप ऍड. वकील यांनी केला. मंगेश डोलारे यांनी उपस्थितांचे आभार मानले.