शासकीय अधिकाऱ्यांशी परस्पर समन्वयानेसामान्य नागरिकांच्या समस्यांचे निराकरण करावे- जिल्हाधिकारी अशोक काकडे-गतिमानता अभियानता उत्कृष्ट अधिकारी उपक्रमांतर्गत पुरस्कार वितरण उत्साहात..
शासकीय अधिकाऱ्यांशी परस्पर समन्वयानेसामान्य नागरिकांच्या समस्यांचे निराकरण करावे- जिल्हाधिकारी अशोक काकडे-गतिमानता अभियानता उत्कृष्ट अधिकारी उपक्रमांतर्गत पुरस्कार वितरण उत्साहात..
सांगली, प्रतिनिधी: महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी लोकोपयोगी उपक्रम आखावेत. अन्य विभागाच्या अधिकाऱ्यांशी परस्पर समन्वयाने सामान्य नागरिकांच्या समस्यांचे निराकरण करावे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी येथे केले.
सांगली जिल्हा गतिमानता अभियानता उत्कृष्ट अधिकारी उपक्रमांतर्गत पुरस्कार वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन सभागृहात आयोजित या कार्यक्रमास जिल्हाधिकारी यांच्या सुविद्य पत्नी शरदिनी काकडे, अपर जिल्हाधिकारी सुशांत खांडेकर, निवासी उपजिल्हाधिकारी अजयकुमार पवार हे दोन्ही अधिकारी सपत्नीक, नगरविकास विभागाचे सहआयुक्त चंद्रकांत खोसे व्यासपीठावर उपस्थित होते.
उत्कृष्ट अधिकारी उपक्रमांतर्गत पुरस्कार मिळालेल्या अधिकाऱ्यांचे अभिनंदन करून जिल्हाधिकारी अशोक काकडे म्हणाले, स्पर्धा परीक्षेतून पद मिळवलेल्या अधिकाऱ्यांचा पिंड स्पर्धात्मक असतो. मात्र, स्पर्धेत अग्रस्थान पटकावणं ही यशाच्या प्रवासातील एक सुरवात असून, ते अग्रस्थान टिकवण्याचं आव्हान असते. त्यासाठी मेहनत करावी लागते. त्यामुळे अधिकाऱ्यांनी आपल्या दैनंदिन कामकाजामध्ये कोणतेही दोन लोकोपयोगी उपक्रम राबवावेत, असे ते म्हणाले
कामकाजाचे तुलनात्मक मूल्यमापन होणे हा शासकीय कामकाजाचा भाग आहे. मूल्यमापन केल्यामुळे आपणास अधिक चांगले काम करण्याची प्रेरणा मिळते, असे सांगून जिल्हाधिकारी अशोक काकडे म्हणाले, महसूल विभागाने दैनंदिन कामकाज करताना कामाची शासन, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी असा प्राधान्यक्रम ठरवावा. त्यानुसार प्राधान्याचे मुद्दे ठरवावेत. कामात गतिमानता आणावी. अन्य विभागाचे अधिकारी आणि महिलांशी सौजन्याने वागणूक ठेवावी. संकेतस्थळ तयार करून ते नियमित अद्ययावत ठेवावे. तहसीलदारांनी मंडल अधिकाऱ्यांच्या कामाचा, प्रलंबित प्रकरणांचा दर आठवड्याला आढावा घ्यावा, असे त्यांनी सूचित केले.
अपर जिल्हाधिकारी सुशांत खांडेकर यांनी हा कार्यक्रम म्हणजे कुटुंबप्रमुखाने अधिकाऱ्यांच्या पाठीवर मारलेली शाबासकीची थाप असल्याचे सांगून अशा कार्यक्रमातून अधिकाधिक लोकोपयोगी कामे करण्यासाठी इतरांनाही प्रेरणा मिळते, असे सांगितले.यावेळी उत्कृष्टल काम केलेले भूसंपादन अधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, मुख्याधिकारी यांचा सत्कार करण्यात आला. निवासी उपजिल्हाधिकारी अजयकुमार पवार, तसेच उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमानंतर आपत्ती व्यवस्थापनांतर्गत आग विझवण्याचे प्रात्यक्षिक व प्रथमोपचाराचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. दरम्यान, जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्यासह महसूल विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बागेत व अशोक स्तंभाजवळील जागेत वृक्षारोपण करण्यात आले.