नवी मुंबई महानगरपालिका ईटीसी केंद्रामध्ये दिव्यांग विद्यार्थ्यांचीही भक्ती प्रबोधनात्मक स्वच्छता दिंडी
नवी मुंबई प्रतिनिधी- नवी मुंबई महानगरपालिका ईटीसी दिव्यांग शिक्षण, प्रशिक्षण व सेवासुविधा केंद्राद्वारे दिव्यांगांना समाजात स्वत:ची ओळख निर्माण करता यावी यासाठी सातत्याने विविध उपक्रम राबविले जातात. याचाच एक भाग म्हणून नव्या शैक्षणिक वर्षामध्ये आषाढी एकादशीनिमित्त़ तसेच केंद्र व राज्य शासनाच्या निर्देशानुसार ‘स्वच्छता अपनाओ – बिमारी भगाओ’ अभियानांतर्गत स्वच्छता दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये सर्व दिव्यांग मुलांनी मोठया उत्साहात सहभाग घेतला.
आषाढी एकादशीनिमित्त ईटीसी केंद्रातील दिव्यांग मुलांना संत संप्रदायाचे महत्व, विविध संतांची माहिती तसेच वारक-यांची दिंडी याबाबत शिक्षकांकडून माहिती देण्यात आली. तसेच स्वच्छतेचे व आरोग्याचे महत्त्वही सांगण्यात आले.
या दिंडीमध्ये सर्व मुले पारंपारिक पोशाखात उपस्थित होती. यामध्ये काही मुलांनी विठ्ठल – रूक्मिणीच्या रूपात या सोहळयात सहभाग घेतला. भगवे ध्वज, डोक्यावर तुळस घेऊन या दिंडीची सुरुवात तिस-या मजल्यावरील मुलांपासून करत पुढे प्रत्येक मजल्यावरील मुले, शिक्षक, निमवैदयकीय कर्मचारी व पालक या दिंडीमध्ये सहभागी होत गेले व त्याची सांगता सभागृहामध्ये दिंडीतील वारक-यांप्रमाणे रिंगण घालून करण्यात आली. दिव्यांग मुलांनी याप्रसंगी फुगडी, झिम्मा यासारखे पारंपारिक खेळ खेळत आनंद घेतला. यावेळी विठोबाराया, ज्ञानेश्वर माऊली, तुकाराम महाराज यांच्या गजराने ईटीसी केंद्र दुमदुमून गेले. ईटीसी केंद्राच्या संचालिका डॉ.अनुराधा बाबर यादेखील दिव्यांग मुलांच्या दिंडीमध्ये सहभागी झाल्या.
नमुंमपा आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी अशाप्रकारच्या सांस्कृतिक कार्यक्रमांमधून मुलांमध्ये सामाजिक उत्सव जपणुकीची शिकवण मिळत असल्याने या कार्यक्रमासाठी प्रोत्साहन दिले आहे. अतिरिक्त आयुक्त श्री.सुनिल पवार यांचेही मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे. या कार्यक्रमाचे नेटके नियोजन हे कार्यालय अधिक्षक तसेच कर्णबधीर विभाग व मतिमंद विभागाचे शैक्षणिक व्यवस्थापक यांनी केले.