लातूर प्रतिनिधी-रेणा नदीवरील रेणापूर, जवळगा, बंधारा येथील पाणी पातळी पूर्ण संचय पातळीला आहे व सद्यस्थितीत बांधा-यामधून पाण्याचा विसर्ग सुरु आहे. रेणा नदीकाठच्या गावांतील नागरिक, शेतकरी आणि नदीकाठच्या वस्त्यांमध्ये राहणाऱ्या सर्वांनी सतर्क राहून विशेष खबरदारी घ्यावी, नदीपात्रात जाणे टाळावे, तसेच आपल्या मालमत्तेची आणि जनावरांची काळजी घ्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
नागरिकांनी दुभती तसेच इतर जनावरे झाडाखाली, पाण्याच्या स्त्रोताजवळ, विद्युत खांबाजवळ बांधू नयेत. त्यांना सुरक्षित ठिकाणी बांधावे. आपल्या जनावरांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करुन स्वतः सुरक्षित ठिकाणचा आसरा घ्यावा. जलसाठ्याजवळ, नदीजवळ जावू नये. आपल्या मुलांना जलसाठ्यावर, नदीवर पोहण्यासाठी पाठवू नये. शाळा, महाविद्यालयातील शिक्षकांनी आपल्या विद्यार्थ्यांना याबाबत सूचित करावे. पुलावरुन, नाल्यावरुन पाणी वाहत असतांना कोणीही स्वतः किंवा वाहनासह पूल, नाला ओलांडण्याचा प्रयत्न करु नये. पूर प्रवण क्षेत्रात कोणीही जावू नये. पाऊस सुरु असतांना विजेच्या तारा, जुन्या इमारती कोसळण्याची शक्यता असते, तरी त्यापासून दूर राहण्याची खबरदारी घ्यावी, असे आवाहन लातूर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणमार्फत करण्यात आले आहे.