शेतकरीस्तरीय ई-पीक पाहणीस २० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ
बुलढाणा, प्रतिनिधी : खरीप हंगाम २०२५ मध्ये अतिवृष्टी, दुबार पेरणी आदी कारणांमुळे अनेक शेतकरी ई-पीक नोंदणी करू शकले नाहीत. अशा शेतकऱ्यांना दिलासा देत राज्य संचालक, जमाबंदी आयुक्त कार्यालय, पुणे यांनी शेतकरी स्तरावरील ई-पीक पाहणी नोंदणीसाठी २० सप्टेंबर २०२५ पर्यंत मुदतवाढ जाहीर केली आहे.
यापूर्वी खरीप हंगाम २०२५ करीता १ ऑगस्ट ते १४ सप्टेंबरपर्यंत शेतकरी स्तरावरून मोबाईल अँपच्या माध्यमातून ई-पीक पाहणी नोंदणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. परंतु अतिवृष्टी व दुबार पेरणीसारख्या प्रतिकूल परिस्थितीमुळे अनेक शेतकरी नोंदणीपासून वंचित राहिले होते.
राज्यातील शेतकऱ्यांना पीक नोंदणीसाठी आणखी संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने ही सहा दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे. मुदतवाढीचा कालावधी संपल्यानंतर उर्वरित शेतकऱ्यांची ई-पीक पाहणी २१ सप्टेंबर ते ४ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत सहाय्यक स्तरावरून पूर्ण केली जाणार आहे. शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी नोंदणी लवकरात लवकर पूर्ण करून घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.